कोल्हापुरातील कळंबा तलाव 'ओव्हरफ्लो', पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 15:51 IST2023-07-29T15:32:49+5:302023-07-29T15:51:25+5:30
हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची गरज

कोल्हापुरातील कळंबा तलाव 'ओव्हरफ्लो', पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
अमर पाटील
कळंबा : उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असणारा ऐतिहासिक शाहू कालीन कळंबा तलाव शनिवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला. तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकताच पर्यटकांची गर्दी झाली होती.
यंदा जुन महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने तलावाची पाणीपातळी चार फुटांवर स्थिरावली होती. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने तलावाचे मुख्य स्रोत असणारे कात्यायनी डोंगरातुन वाहणारे सातही नैसर्गिक नाले दुथडी भरून वाहू लागले आणि अवघ्या आठवड्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला.
पोलिस बंदोबस्ताची गरज
रविवारी पर्यटकांची होणारी गर्दी विचारात घेता धोकादायक सांडवा मनोऱ्या नजीक महिलांची छेडछाड, मद्यपान करून हुल्लडबाजी करणे असे विकृत प्रकार व हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिस बंदोबस्त गरजेचा असून पालिका मालकीच्या तलावावर कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे.
पर्यटकांनी सेल्फीसाठी धोकादायक मनोऱ्यावर जाऊ नये. वाहत्या सांडव्यावरून चालत जाऊ नये. हुल्लडबाजी न करता वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यावा. - सुमन गुरव, सरपंच