Kolhapur: आम्ही डोकं टेकवायचं, तुम्ही जनावरासारखं बदडायचं, हा उन्माद सहन करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:58 IST2026-03-31T11:58:11+5:302026-03-31T11:58:50+5:30
'जोतिबा मंदिरात शासकीय पुजारी नेमावेत, अन्यथा मोठे जनआंदोलन उभा करु'

Kolhapur: आम्ही डोकं टेकवायचं, तुम्ही जनावरासारखं बदडायचं, हा उन्माद सहन करणार नाही
कोल्हापूर : वाडी रत्नागिरीतील जोतिबा हा अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येतात. येथे माथा टेकवून देवाप्रति इच्छा-अपेक्षांचे दान मागतात. मात्र, देवापर्यंत जाण्यासाठी ज्यांच्या पायावर माथा टेकवायचा तेच आम्हाला जनावरासारखं बदडत असतील तर त्यांचा हा उन्माद भाविक कधीच सहन करणार नाहीत. प्रशासनाने त्वरित अशा प्रवृत्तींवर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा भोगावती खोऱ्यातील ग्रामस्थांनी सोमवारी दिला.
जोतिबा मंदिरातील पुजाऱ्यांविरोधात परिते ग्रामस्थांनी काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींनीही भावना मांडल्या. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, धीरज डोंगळे, ‘भोगावती’चे चेअरमन शिवाजीराव पाटील, अमर पाटील, वसंतराव मुळीक, शिंदेसेनेचे जर्नाधन पाटील, जालंधर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वाचा: ‘लोकमत’चे फलक मोर्चात उत्स्फूर्तपणे झळकले, दांभिकतेला चपराक दिल्याची मोर्चेकऱ्यांची भावना
शिवाजीराव पाटील म्हणाले, जोतिबा मंदिरातील पुजाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरही कुठे गालबोट लागू नये म्हणून परित सरपंचांनी माफीनामा लिहून दिला होता. मात्र, तरीही पुजाऱ्यांनी गावची बदनामी करायला सुरुवात केली. हा प्रकार आम्ही सहन करणार नाही यासाठीच हा मोर्चा काढला. प्रशासनाने याची दखल घेऊन जोतिबा मंदिरात शासकीय पुजारी नेमावेत, अन्यथा मोठे जनआंदोलन उभा करु. जालंधर पाटील म्हणाले, आजचा मोर्चा केवळ जोतिबा मंदिरापुरता मर्यादित नाही तर राज्यभरातील सर्वच मंदिरामध्ये शासकीय पुजारी नेमण्यासाठी सुरू झालेली ही चळवळ आहे.
हंबीरराव पाटील म्हणाले, आम्ही श्रद्धेने तुमच्या पायावर डोकं टेकवायचं आणि तुम्ही जनावरासारखी वागणूक देत भाविकांना बदडायचे, हा उन्माद येथून पुढच्या काळात कधीच सहन करणार नाही. वसंतराव मुळीक म्हणाले, पुजाऱ्यांनी हा उन्माद करू नये. अन्यथा त्यांचा कोणताही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. जर्नाधन पाटील म्हणाले, जोतिबा डोंगरावर झालेल्या घटनेचे प्रशासनाला गांभीर्य नाही. त्यात प्रशासनाने जबाबदारी झटकायचे काम केले आहे. मंदिराच्या विकासासाठी सरकारने २६० कोटी रुपयाचा निधी दिला आहे. पण त्या प्रमाणात येथे साेयी-सुविधा दिल्या जात नाहीत. यावेळी अजित पाटील, साताप्पा पाटील, नामदेवराव पाटभल, धनाजी पाटील, प्रमोद पाटील, बाबासाहेब देवकर, रोहित पाटील उपस्थित होते.
देखाव्यातून मांडली पुजाऱ्यांची वागणूक
या मोर्चात जोतिबावरील पुजारी भाविकांना कशा प्रकारे वागणूक देतात याचा एक सजीव देखावा तयार करण्यात आला होता. एका ट्रॅक्टर-ट्रॉलीत केदार पाटील या सहावीतील मुलाला जोतिबा बनवण्यात आले होते, तर पुढे पाच-सहा पुजारी एका भाविकाच्या डोक्यावर नारळ फोडत आहेत असा देखावा केला होता.
पांढऱ्या टोप्यांनी वेधले लक्ष
या मोर्चात सर्वच ग्रामस्थांच्या डोक्यावर पांढऱ्या टोप्या होत्या. त्यावर जोतिबाच्या नावानं चांगभलं असा मजकूर लिहिला होता. महिलांसह ज्येष्ठ नागरिकही यात सहभागी झाले होते.
घडवले शिस्तीचे दर्शन
हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ या मोर्चात आले होते. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मोर्चाच्या वाटेत ग्रामस्थांनी शिस्तीचे दर्शन घडवले. मूक मोर्चा असल्याने एकानेही घोषणा किंवा निषेध केला नाही. एका रेषेत जात ग्रामस्थांनी वाहनधारकांचीही अडवणूक केली नाही.
तळपत्या उन्हात ग्रामस्थ चालले
सोमवारी उन्हाचा पारा चांगलाच वाढला होता. मात्र, ग्रामस्थांनी भर उन्हात मोर्चात चालत जात आपल्या मागण्या जिल्हा प्रशासनाला कळविल्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या ग्रामस्थांसाठी काही ग्रामस्थांनी पाण्याचीही व्यवस्था केली होती.
मोर्चासाठी लोटला अख्खा गाव
गेल्या कित्येक शतकांची परंपरा असलेल्या परितेतील सासनकाठीदरम्यान ग्रामस्थांना झालेल्या मारहाणीमुळे परिते गावातील प्रत्येक कुटुंबातील दोन-तीन सदस्य या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती. येथील शाळा, सर्व खासगी आस्थापने, कार्यालये बंद ठेवून गावकरी मोर्चासाठी आले होते.