कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनुकंपावर राजकारणात भरती झालेले नेते असून, त्यांनी कोणताही संघर्ष केलेला नाही. सांगलीसाठी कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. आता ते प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची भाषा करत आहेत, त्यांची ही अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी झाल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.आमदार पडळकर हे बुधवारी कोल्हापुरात आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार पडळकर म्हणाले की, रायगड किल्ल्यावर धनगर समाजाच्या घरांवरून उफाळलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, “स्वराज्यामध्ये धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे. छोट्या-छोट्या वाटा शोधून दुश्मनावर हल्ला करायचा आणि त्या वाटा पुन्हा मुजवायच्या, शत्रूंची सर्व गुप्त माहिती महाराजांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती; पण आता कुणाच्या डोळ्यात धनगर समाजाची घरं खुपतात माहिती नाही. पुरातत्त्व विभागाने नोटिसा मागे घ्याव्यात, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगत त्यांनी समाजाला दिलेल्या नोटीसची प्रत फाडून निषेध केला.
जयंत पाटलांची अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी, गोपीचंद पडळकर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:05 IST