जैन महामंडळ आणखी मजबूत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:56 IST2025-01-07T12:55:53+5:302025-01-07T12:56:45+5:30
नांदणी मठाला अ वर्ग दर्जा देऊ, नांदणी येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला भेट

जैन महामंडळ आणखी मजबूत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन
जयसिंगपूर/उदगाव : जगा आणि जगू द्या, ही शिकवण देणारा हजारो वर्षांचा इतिहास सांगणारा प्राचीन धर्म म्हणजे जैन धर्म. जैन समाजाने अहिंसा व अपरिग्रह सांगितले आहे. जगात सर्वाधिक पुण्यकार्य, दानकार्य व समाजकार्य करणारा समाज म्हणून जैन धर्माची ओळख आहे. सरकारने जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार केले आहे. मजबूत पिढी उभे करण्याचे काम या महामंडळाच्या माध्यमातून कसे करता येईल, हा प्रयत्न असणार आहेत. हे महामंडळ आणखी बळकट करू त्याला आर्थिक पाठबळ देऊ, तसेच नांदणी येथील मठाला अ वर्ग दर्जा निश्चित देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नांदणी (ता.शिरोळ) येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि मस्तकाभिषेक महामहोत्सवाला मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काल नागपूरमध्ये जितोमधून काम करणाऱ्या जैन समाजाला पाहिले आणि आज कोल्हापुरातील काळ्या आईची सेवा करणाऱ्या कष्टकरी समाजाला पाहण्याचाही योग मला मिळाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापुरातील पहिलेच कार्यक्रम दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या नांदणी मठाच्या कार्यक्रमाला येण्याचा मला मान मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नांदणी मठाच्या वतीने जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रजागर्क ही उपाधी व मानपत्राने सन्मानित करण्यात आले.
आचार्य विशुद्धसागरजी महाराज म्हणाले, भगवान आदिनाथ यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या प्रमुखपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत विहार करावा. श्रीराम, भरत व ऋषभनाथ यांच्या राज्यात ज्याप्रमाणे कोणत्याही धर्माला साधूसंतांना उपासना करण्यात कोणताही अडसर येत नव्हता. त्याचप्रमाणे, आपल्या राज्यात साधुसंतांना विहार करताना उपासना करताना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे आवाहन महाराज यांनी केले.
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, आपल्या भागातील जैन समाज हा शेतकरी व कष्टकरी आहे. येथील शेतकरी कष्टाळू असून, सध्या प्रत्येकांची शेती कमी होत आहे. पर्यायाने आमच्या समाजातील मुले पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी जात आहेत. मात्र, त्यांना त्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. जैन समाजासाठी राज्य शासनाकडून पुणे, मुंबई या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. आपण त्या ठिकाणी आश्रम उभा करू, असे सांगून नांदणी मठासाठी ३० ते ३५ कोटींची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सुरेश खाडे, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी मोसमी बर्डे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, स्वरूपा पाटील-यड्रावकर, सुरेश हाळवणकर, सुरेश पाटील, शौमिका आवाडे, उद्योजक आण्णासाहेब चकोते, सागर शंभूशेटे, उत्तम पाटील, संभाजी भिडे, जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कर्मवीरचे रावसाहेब पाटील, सरपंच संगीता तगारे यांच्यासह आचार्य व मुनीसंघ, श्रावक-श्राविका उपस्थित होते.
शांतीसागर महाराज यांना भारतरत्न द्या : शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. निवेदनात संपूर्ण समाजाच्या वतीने नांदणी मठाला अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली आहे, तसेच आचार्य शांतीसागर महाराज यांना आचार्यपद मिळून शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने भारत सरकारकडून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशीही मागणी निवेदनात केली आहे.