शेडबाळ-वैशाली विशेष रेल्वेची जैन समाजाची मागणी

By Admin | Updated: December 24, 2015 01:05 IST2015-12-24T01:05:27+5:302015-12-24T01:05:54+5:30

त्रिदिवसीय जन्मकल्याणक महोत्सव : वैशालीच्या विकासासाठी निधी द्या

Jain community demand for Shadabal-Vaishali special train | शेडबाळ-वैशाली विशेष रेल्वेची जैन समाजाची मागणी

शेडबाळ-वैशाली विशेष रेल्वेची जैन समाजाची मागणी

बाहुबली : तीर्थंकर भगवान महावीर यांची जन्मभूमी वासोकुण्ड, वैशाली (बिहार) येथे १९ एप्रिल २०१६ रोजी त्रिदिवसीय जन्मकल्याणक महोत्सव होणार आहे. यासाठी पूज्य आचार्य विद्यानंदी महाराज यांचे जन्म ठिकाण शेडबाळ (कर्नाटक) ते वैशाली (बिहार) दरम्यान रेल्वे सुरू करावी. तसेच वैशालीच्या विकासासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी जैन बांधवांच्या राष्ट्रीय पातळीवर कुंदकुन्द ट्रस्ट दिल्ली, दक्षिण भारत जैन सभा, समस्त जैन समाजाने केली आहे.
कोल्हापूरचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक यांच्या सान्निध्यात दक्षिण भारतातील जैन बांधवांना प्रेरित करण्यासाठी या सभेचे बाहुबली येथील एडोमेन्ट ट्रस्ट येथे आयोजन केले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कल्लाप्पाणा आवडे होते. यावेळी बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजक लाल बहादूर विश्वविद्यालय जैन विभागाचे प्रमुख डॉ. जयकुमार उपाध्ये (दिल्ली) यांनी भगवान महावीरांच्या जन्मस्थळ वैशाली येथे निर्माणाधिन विविध मंदिरांबद्दल माहिती दिली.
आवाडे यांनी दक्षिण भारतात सर्वाधिक जैन समाज आहे तो अशा धार्मिक समारंभाना सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. यावेळी सतीशचंद्र जैन, माजी न्यायमूर्ती सनत्कुमार आरवाडे, अनिल जैन (कॅनडा), राजकुमार जैन (दिल्ली), रावसाहेब पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भट्टारक स्वामींनी आशीर्वचन दिले. बाहुबलीवरील प्रतिकात्मक मानस्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मिलिंद फडे पुणे, ए. ए. कापसे, महावीर गाठ, बी. टी. बेडगे, श्रीधर हेरवडे, रावसाहेब पाटील, डी. सी. पाटील उपस्थित होते.

वैशाली पंचकल्याणकच्या निमित्ताने दक्षिण व उत्तर भारतातील जैन बांधवतील दरी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे जैन बांधवांमध्ये उत्साह पहावयास मिळत होता.

Web Title: Jain community demand for Shadabal-Vaishali special train