Kolhapur Crime News: किरकोळ झाला वाद... तरी थेट पाडतात मुडदा, ६२ खून; इचलकरंजी परिसर गुन्ह्यांचा हॉटस्पॉट
By उद्धव गोडसे | Updated: March 11, 2026 12:05 IST2026-03-11T12:05:22+5:302026-03-11T12:05:38+5:30
पोलिसांचा धाक कमी झाला आहे की अर्थपूर्ण घडामोडींमुळे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात?

Kolhapur Crime News: किरकोळ झाला वाद... तरी थेट पाडतात मुडदा, ६२ खून; इचलकरंजी परिसर गुन्ह्यांचा हॉटस्पॉट
उद्धव गोडसे
कोल्हापूर : रागाने पाहिले, दुचाकी आडवी मारली, आईवरून शिवी दिली, उसने घेतलेले पैसे परत दिले नाहीत... अशा किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादात थेट मुडदे पाडण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. गेल्या १४ महिन्यांत जिल्ह्यात ६२ खून झाले. यातील बहुतांश गुन्ह्यांच्या मुळाशी क्षुल्लक कारणे आहेत. त्यामुळे क्षणिक राग तरुणाईचे करिअर उद्ध्वस्त करणारा ठरत आहे. विशेषत: इचलकरंजी परिसर गंभीर गुन्ह्यांचा हॉटस्पॉट बनत आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात खुनांचे प्रमाण काहीसे कमी आहे. कोल्हापूर शहरात खुनाच्या घटना कमी घडतात. याउलट इचलकरंजी, तारदाळ, कबनूर, यड्राव या परिसरात खुनाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे शिरोली एमआयडीसी, गांधीनगर, गोकुळ शिरगाव या औद्योगिक पट्ट्यातही खुनांचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश खून पूर्ववैमनस्यातून होतात.
पूर्वीच्या वादाचा राग डोक्यात ठेवून दोन गट आमने-सामने येताच संघर्षाची ठिणगी पडते. यातून गेल्या १४ महिन्यांत पूर्ववैमनस्यातून १८ खून झाले. आर्थिक वादातून १०, चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून प्रत्येकी चार खुनांची नोंद झाली. आईवरून शिवी दिली, रागाने पाहिले, शेताची वाट अडवली अशा किरकोळ कारणांतूनही थेट मुडदे पाडण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.
खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढत आहेत. कोल्हापुरातील राजेंद्रनगर, टेंबलाईवाडी यासह इचलकरंजी, गांधीनगर येथील काही घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग आढळला. झोपडपट्ट्यांमध्ये तर अवघी तरुणाई असा गंभीर गुन्ह्यांमध्ये गुरफटली आहे. त्यामुळे येणा-या काळात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण आणखी वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
वर्ष - खून
२०२३ - ६२
२०२४ - ५८
२०२५ - ५१
२०२६ - १२
गुन्हेगारीचे उदात्तीकरण
शहरासह जिल्ह्यातील काही गुंडांच्या टोळ्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत आहेत. गुंडांचे फलक प्रमुख चौकांमध्ये लागतात. सोशल मीडियातून त्यांच्या रिल्स व्हायरल होतात. गेल्या आठवड्यात तर बाल निरीक्षण गृहातून सुटका होताना एका अल्पवयीन गुन्हेगाराचे रिल्स व्हायरल झाले होते. यातून होणारे उदात्तीकरण गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
धाक कमी झाला?
तडीपारीच्या कारवाईचे उल्लंघन करून अनेक गुन्हेगार शहरात वावरत आहेत. ताराराणी चौक परिसरात कुचकोरवी टोळीतील पाच ते सहा तडीपार गुन्हेगारांनी शहरात जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले. तरीही पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला आहे की अर्थपूर्ण घडामोडींमुळे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.