Coronavirus in Maharashtra हाकलून लावण्याची भाषा नको; मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरलात का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 16:39 IST2020-05-21T16:36:26+5:302020-05-21T16:39:39+5:30
हे लोक दीड-दोन महिने तिथे अडकले. तिथे रोजगार नाही, दहा बाय दहाच्या खोलीत ४० अंश तापमान असताना राहायची पाळी त्यांच्यावर आली. त्यानंतर सरकारने परवानगी दिल्यावर हे लोक कोल्हापूरला आले आहेत. त्यांच्यापासून आवश्यक ती दक्षता घेऊन व सर्व तपासण्या करून त्यांना गावांनी आधार दिला पाहिजे.

Coronavirus in Maharashtra हाकलून लावण्याची भाषा नको; मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरलात का?
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांत मुंबईकरांमुळे कोल्हापुरात कोरोनाची संख्या वाढली, त्यांच्यामुळेच कोल्हापूरची स्थिती बिघडली, अशी हेटाळणी करणारी भाषा सर्वच स्तरांवर होत असून, ती आपल्याच माणसामाणसांमध्ये दरी निर्माण करणारी आहे. असे ज्यांना वाटते, त्यांनी मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरता कामा नये. कोरोनाचे संकट आज नाही तर उद्या दूर होईल; परंतु त्यातून तयार झालेला दुरावा पुढची कित्येक वर्षे मतभेदाचे चटके देत राहील, याचे भान बाळगण्याची गरज आहे.
कोल्हापुरात बाहेरून प्रवास करून जे आले त्यांच्यामुळेच कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झाला आहे हे मान्यच; परंतु जे बाहेरून म्हणजे मुख्यत: मुंबईतून आले ते काही मूळचे मुंबईचे नव्हेत. त्यांची जन्मभूमी कोल्हापूर आहे. पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यावर त्यांना गावी येता आले नाही. जे अविवाहित होते ते एक बॅग घेऊन रस्त्याला लागले; परंतु जे कुटुंबासह राहतात त्यांतील बहुतांश काही ना काही उद्योग करतात; त्यामुळे सगळेच तिथे टाकून त्यांना लगेच मुंबई सोडणे शक्य नव्हते; शिवाय गावांकडूनही नाके बंद आहेत, सोडत नाहीत, तुम्ही इकडे येऊ नका, असे त्यांना फोन गेले; त्यामुळे हे लोक दीड-दोन महिने तिथे अडकले. तिथे रोजगार नाही, दहा बाय दहाच्या खोलीत ४० अंश तापमान असताना राहायची पाळी त्यांच्यावर आली. त्यानंतर सरकारने परवानगी दिल्यावर हे लोक कोल्हापूरला आले आहेत. त्यांच्यापासून आवश्यक ती दक्षता घेऊन व सर्व तपासण्या करून त्यांना गावांनी आधार दिला पाहिजे.
आता मुंबई पासिंगची गाडी दारात जरी नुसती थांबली तरी लोक अंगावर धावून येत आहेत. त्यांच्याकडे पाहून तोंडे वाकडी होऊ लागली आहेत. कोरोनामुळे हा नवा वाद तयार झाला आहे. तो समाजात दुही निर्माण करणारा आहे. महापूर असो की गावांतील कोणतेही काम असो किंवा नोकरी-धंद्यासाठी तुम्ही मुंबईत गेल्यावर तुम्हाला आधार देण्याचे काम याच माणसांनी केले आहे. आज ते अडचणीत आहेत. अशा काळात त्यांना धीर देण्याची जबाबदारी गावांची आहे. सोशल डिस्टन्सिंंग जरूर पाळा; परंतु त्यातून सामाजिक दुरावा निर्माण होईल असे व्यवहार नकोत, याची दक्षता दोन्ही पातळ्यांवर घेण्याची गरज आहे.
दृष्टिक्षेपात मुंबईकर
कोल्हापूर जिल्ह्यात १३ मेपासून १६ हजार ७९६ लोक आले आहेत. त्यांतील मुंबई, मुंबई उपनगरे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांतून १५ हजार १३४ लोक आले आहेत; तर पुणे व सोलापूर या रेड झोनमधील जिल्ह्यांतून १६६२ लोक आले आहेत. आलेल्या लोकांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा- ३७८२, गडहिंग्लज- २२४३, चंदगड- १९४१, भुदरगड- १५४१, हातकणंगले- १५२०, कोल्हापूर शहर - १३८३, करवीर- ९८९, शाहूवाडी- ७९९, कागल- ७७९, शिरोळ- ७१४,राधानगरी- ६७५, पन्हाळा- ३६७ आणि गगनबावडा- ६३.
आम्ही पोट भरण्यासाठी मुंबईत गेलो असलो तरी मूळचे कोल्हापूरचे आहोत. आता आम्ही कुणीतरी दहशतवादी असल्यासारखा अनुभव आमच्याच गाववाल्यांकडून आम्हाला येत आहे. महापूर आला तेव्हा आठ दिवस आम्हाला मुंबईत झोप आली नाही; परंतु आता आमचेच लोक आमच्याकडे माणूस म्हणूनही बघायला तयार नाहीत, याचेच फार वाईट वाटते. हे दिवस पण जातील, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.
- भरमू नांगनूरकर, अध्यक्ष, युवा एकता मंच, मुंबई
वेळ प्रत्येकावर येते. मुंबईकर बांधव रीतसर पोलीस खात्याचा पास घेऊन गावी आले आहेत. त्यांची जरूर सर्व तपासणी व्हावी; परंतु त्यांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जात आहे, ती वेदनादायी आहे. गावच्या कोणत्याही संकटात आम्ही आमचा भाऊ अडचणीत आहे, असे समजून मदतीला धावून गेलो आणि आता आमच्यावर वेळ आल्यावर मात्र लोक बाजू काढू लागले आहेत, हे योग्य नव्हे.
- योगेश चव्हाण, अध्यक्ष, नवी मुंबई कोल्हापूर रहिवासी संघ,