कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची उडाली ताराबंळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:16 IST2026-03-18T19:13:47+5:302026-03-18T19:16:20+5:30
तब्बल पाऊण तास पाऊस : उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारवा

कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची उडाली ताराबंळ
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बुधवारी दिवसभर ढगाळ हवामान राहिले. सायंकाळी सात वाजता कोल्हापूर शहराला गारांसह जोरदार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तब्बल पाऊस तास गारांचा वर्षाव सुरू राहिला. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा सुखद गारवा मिळाला.
मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बुधवारी सकाळी वातावरणात काहीसा गारठा जाणवत होता. त्यानंतर हळूहळू सूर्य नारायणाने दर्शन दिले, पण दिवसभर ढगाळ हवामान राहिले. बुधवारी दिवसभरात कमाल तापमान ३४ डिग्री तर किमान २० डिग्रीपर्यंत राहिल्याने ढगाळ हवामान असले तरी काहीसा उष्मा जाणवत होता.
सायंकाळी ६:३० पासून जोरदार वाऱ्यांसह आकाशात ढग गोळा हाेऊ लागले. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह ७ वाजता पावसाला सुरुवात झाली. टपोऱ्या गारांनी नागरिकांना झोडपून काढल्याने वाहनधारकांची अक्षरश: तारांबळ उडाल्याचे चित्र कोल्हापुरात पहावयास मिळाले. पाऊस व गारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मिळेल तिथे आडोसा घेतला. तर, लहान मुलांनी पावसात भिजत गारा वेचण्याचा आनंद लुटला.
आजपासून आकाश स्वच्छ राहील, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, कमाल तापमानात वाढ होत जाणार आहे. रविवारीपर्यंत ती वाढ राहणार असून त्या दिवशी ३६ डिग्रीपर्यंत तापमान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हलगीसारखा आवाज
गारांचा वर्षाव इतका वेगाने होता, की घरांचे पत्रे, खापऱ्यावर पडल्यानंतर त्याचा मोठा आवाज येत होता. हलगी वाजल्यासारखा आवाज येत राहिला.
नागरिकांची तारांबळ
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी सायंकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना भिजतच घरी परतावे लागले तर तब्बल पाऊण तास पाऊस सुरू राहिल्याने अनेकांची कोंडी झाली होती.
ढगाळ हवामानाचा भाजीपाल्याला फटका
जिल्ह्यात उन्हाळी भाजीपाला मोठा प्रमाणात घेतला जातो. मध्यंतरी तापमानात एकदम वाढ झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला हाेता. आता ढगाळ हवामान आणि गारपीटचा भाजीपाल्याला फटका बसणार आहे.
असे राहील तापमान, डिग्रीमध्ये ...
वार - किमान - कमाल
गुरुवार - १९ - ३४
शुक्रवार - १९ - ३५
शनिवार - २१ - ३५
रविवार - २२ - ३६