Kolhapur: महादेवराव महाडिक ‘गोकुळ’च्या रिंगणात उतरणार, सत्तारूढ गटावर केला पलटवार, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:33 IST2025-06-05T16:32:02+5:302025-06-05T16:33:57+5:30
'ही खरी मखलाशी असून, फार काळ शेतकऱ्यांना फसवू शकत नाही'

Kolhapur: महादेवराव महाडिक ‘गोकुळ’च्या रिंगणात उतरणार, सत्तारूढ गटावर केला पलटवार, म्हणाले..
कोल्हापूर : ‘गोकुळ’वर गोरगरिबांचे संसार उभे आहेत, पण गेल्या चार वर्षांत दूध संस्थांसह शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. गाय व म्हैस दुधाला सर्वाधिक दर दिल्याचा डांगोरा काहीजण पिटत असले, तरी गाय दूध खरेदी दर ३७ रुपये करत असताना, विक्री दरातही तेवढीच वाढ केली. पण, खरेदी दर ३७ वरून ३० रुपये केल्यानंतर विक्री दरात केवळ दोन रुपयांची कपात केली. ही खरी मखलाशी असून, फार काळ शेतकऱ्यांना फसवू शकत नाही. सामान्य दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी संघाच्या आगामी निवडणुकीत समविचार नेत्यांना सोबत घेऊन रिंगणात उतरणार असल्याची घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी केली.
अध्यक्ष निवडीनंतर ‘गोकुळ’च्या दुधाला आता चांगलीच उकळी आली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या आरोपावर संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी उत्तर दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार महाडिक यांनी सत्तारूढ गटावर पलटवार केला.
महाडिक म्हणाले, संघाच्या निवडणुकीत वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांची दिशाभूल केली. ‘सत्ता द्या वासाचे दूध परत करतो’, असे म्हणणाऱ्यांनी चार वर्षांत का परत केले नाही? अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार वासाचे दूध परत करता येत नाही, ही वस्तुस्थिती असताना तत्कालीन काळात त्याच खात्याचे राज्यमंत्री असलेल्यांना हे माहिती नसावे, हे दुर्दैवी आहे.
‘अमूल’चे दीड लाख लिटर संकलन हे कोणाचे अपयश?
आम्ही सत्तेत असताना ‘अमूल’ने जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांचे काही चालले नाही. मात्र, आता रोज दीड लाख लिटर संकलन करत आहे. राजकीय द्वेषातून एका संचालकाने टाकळी (शिरोळ) येथील बल्क कुलर काढून घेतले, ते १२ हजार लिटर दूध रोज ‘अमूल’कडे गेले. या मंडळींच्या कारभारामुळेच ‘अमूल’चे जिल्ह्यातील दूध संकलन वाढले असून, हे अपयश कोणाचे? असा सवालही महाडिक यांनी केला.
दीड हजार संस्था वाढल्या, पण दूध कोठे गेले?
गेल्या चार वर्षांत ‘गोकुळ’शी संलग्न दीड हजार संस्था वाढवल्या, पण त्यांचे दूध कोठे गेले? परजिल्ह्यातून रोज पाच लाख लिटर दूध आणून १८ लाखांचा टप्पा पार केल्याच्या हे गप्पा मारतात, असेही महाडिक यांनी सांगितले.