कोल्हापूर : अंगारकी संकष्टीनिमित्त मंगळवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ओढ्यावरील गणेश मंदिर व बिनखांबी गणेश मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मंदिरातील धार्मिक विधी केले जातील, अशी माहिती समितीचे सचिव विजय पोवार यांनी दिली आहे.कोरोनोच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. अंगारकी संकष्टीचा योग वर्षातून एक- दोनदाच येत असल्याने यादिवशी गणेश दर्शनासाठी नागरिक मंदिरात मोठी गर्दी करतात.
ही गर्दी टाळण्यासाठी समितीने मंदिरच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांकडूनचे अभिषेक, दर्शन याबाबी बंद असतील; मात्र देवतांचे धार्मिक विधी नियमितपणे पार पडतील, असे समितीने स्पष्ट केले आहे.