पंचगंगेत बुडणाऱ्या औरंगाबादच्या चौघा भाविकांना वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 18:19 IST2023-02-15T18:19:01+5:302023-02-15T18:19:29+5:30
गवळी यांनी आतापर्यंत १८ जणांना पंचगंगा नदीमध्ये बुडतांना वाचवले

पंचगंगेत बुडणाऱ्या औरंगाबादच्या चौघा भाविकांना वाचवले
कोल्हापूर : येथील पंचगंगा घाटावर नदीतील पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्या औरंगाबाद येथील बुडणाऱ्या चार प्रवाशांना पंचगंगा विहार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास वाचवले. बुडणारे चारही प्रवासी सुखरूप राहिले.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी औरंगाबादहून भाविक खासगी बसने शहरात दाखल झाले. ते सकाळी पंचगंगा नदीघाटावर विसाव्यासाठी थांबले. त्यावेळी पंचगंगा नदीतील पाण्यात अंघोळीला उतरलेल्या दगडाबाई दिवटे या बुडू लागल्या.
हे निदर्शनास येताच त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या नात्यातील सविताबाई कोके, राहिबाई बेडके, सुधाकर दिवळे हे बचावासाठी गेले. पण हेही बुडू लागले. पंचगंगा विहार मंडळाचे कार्यकर्ते रमेश गवळी, उदय कदम यांच्या निदर्शनास आले असता, या तिघांनी त्यांना धोक्यातून बाहेर काढले. आतापर्यंत गवळी यांनी १८ जणांना पंचगंगा नदीमध्ये बुडतांना वाचवले आहे.