ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:58 IST2026-04-13T10:55:01+5:302026-04-13T10:58:00+5:30
Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal: मराठी चित्रपट महामंडळ बचाव समिती स्थापन: आंदोलनाचे पाऊल

ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: अध्यक्ष संचालकांच्या वादात डबघाईला गेलेले आणि अस्तित्वच मिटत असलेले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही आपली मातृ व शिखर संस्था वाचविण्यासाठी राज्यातील चित्रपट व्यावसायिक सरसावले आहेत. व्यावसायिकांनी एकत्र येत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बचाव समिती स्थापन केली असून त्या माध्यमातून महामंडळ बचावासाठीचे आंदोलन छेडले जाणार आहे.
गेल्या सहा वर्षांपासून अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे महामंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच कलाकारांनी बचावासाठी हालचाल सुरू केली आहे.
कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपट व्यावसायिकांसाठी ज्यांना काम करायचे आहे त्यांनीच महामंडळावर यावे. आता मराठी चित्रपटसृष्टीसमोर नवी आव्हाने असताना ते सोडवण्यासाठी महामंडळाने काम करणे अपेक्षित असताना या सर्वांनी गेल्या पाच वर्षांत त्याचे मातेरे केलं आहे. आता हे थांबवून महामंडळाला पुनरुज्जीवन देण्याची वेळ आली आहे. आनंद काळे, कलाकार, निर्माते
वाद मिटूच नये यासाठी खेळी...
निवडणूक नोव्हेंबर २०२२ मध्ये जाहीर झाली. अचानक ४०-५० हजार सभासद का केले गेले, त्यांच्या पात्रतेवर तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला कारण त्यांच्या सभासदत्वाला कार्यकारिणीच्या मंजुरीचा ठराव नव्हता. त्यामुळे मतदानाचा अधिकार ६ हजार जणांना राहिला. त्यावरून उच्च न्यायालयात वाद सुरू आहे. तिथे अजून सुनावण्या व्हायचा अवकाश सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला गेला. म्हणजे हा वाद कधी मिटूच नये यासाठीच जणू ही खेळी केली गेली.
आंदोलनाचे टप्पे
संचालक मंडळ आणि विरोधक यांची एकत्रित मीटिंग बोलावणे.सह्यांची मोहीम राबवणे, जिथे जिथे शूटिंग चालू आहे तिथे आपल्यातल्या कार्यकर्त्यांनी जाऊन सह्या घेणे. सर्व केसेसमध्ये महामंडळातर्फे असलेल्या वकिलांशी बोलून सत्य परिस्थितीचा अंदाज घेणे. धर्मादाय कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक. महामंडळाच्या दारात आंदोलनाला बसणे.
१० जणांच्या वादात महामंडळ वेठीला
हा वाद फक्त अध्यक्ष आणि कार्यकारिणीतील काही संचालकांमधला आहे. त्यांच्यामुळे हजारो सभासद, महामंडळाचे अस्तित्व वेठीला धरले आहे. विशेष म्हणजे संबंधितांना याचे काही वैषम्य वाटत नाही. आमच्या आयुष्यावर त्याचा काही परिमाण होत नाही ना, मग चाललंय तसं चालू दे अशी मानसिकता आहे....
त्यांचेच सभासदत्व रद्द करा
हे वीस-बावीस लोक जे कोणी असतील, आम्ही का केस मागे घेऊ ह्या भूमिकेतून बाहेर येत नसतील तर त्यांचे सभासदत्व रद्द करावे. महामंडळाची निवडणूक घेऊन लवकरात लवकर नवी कार्यकारिणी अस्तित्वात आणावी. ह्यावर सगळे लक्ष केंद्रित करावे असा पर्याय काही सभासदांनी सूचवला आहे.