Kolhapur: कळे रस्त्यावर तोडली झाडे चौदाशे, साडेपाच हजारपैकी लावली फक्त पाचशे
By संदीप आडनाईक | Updated: June 2, 2025 17:31 IST2025-06-02T17:29:31+5:302025-06-02T17:31:32+5:30
वनविभागाची बांधकाम विभागाला नोटीस : महामार्ग प्राधिकरणचा झाडे लावल्याचा दावा

Kolhapur: कळे रस्त्यावर तोडली झाडे चौदाशे, साडेपाच हजारपैकी लावली फक्त पाचशे
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा रस्ते रुंदीकरणदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गालगत रस्त्याच्या दुतर्फा तोडलेल्या १३९४ झाडांच्या बदल्यात ५५७६ झाडे लावणे अपेक्षित असताना अशास्त्रीय पद्धतीने अवघी ५०० विदेशी रोपे लावली आहेत.
याबाबत कोल्हापूर वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प यांना नोटीस काढलेली आहे. दरम्यान यासंदर्भात निसर्गप्रेमींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह पोलिस अधीक्षक कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रार केली असून या प्रकरणाची दाद मागितली आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वृक्षतोड प्रकरणी जिल्ह्यातील सर्व निसर्गप्रेमी, वर्ल्ड फॉर नेचर संस्थेने १९ मे रोजी वनविभागाकडे तक्रार केली होती. यासंदर्भात संस्थेने २८ मे रोजी कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांची भेट घेतली. यावेळी अरुण सावंत, दिग्विजय शिर्के, परितोष उरकुडे, विदुला स्वामी, अमोल बुड्ढे, सविता साळोखे, स्वाती कदम, मंगल काळे, संतोष औंधकर, अरुणकुमार पोतदार, अभिजीत वाघमोडे यांनी संबंधित ठेकेदाराने पन्हाळा तालुक्यातील मौजे इंजोळे आणि वाघवे गावात गुलमोहर, निलमोहर, पेल्टोफोरम, शंकासूर, विलायती चिंच, अशी ५०० रोपांची अशास्त्रीय पद्धतीने लागवड करून नियम आणि निकषांची पायमल्ली केल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आणून दिले. वनविभागाने या तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात रस्त्याच्या दुतर्फा १० ते १२ फूट उंचीची झाडे लावण्याचा आदेश नोटिसीत दिला आहे.
निकष धाब्यावर
ठेकेदाराने आंबा, फणस, वड, पिंपळ, लिंब अशी १० ते १२ फूट लांबीचे रोपे लावणे अपेक्षित होते; पण निसर्गप्रेमींच्या रेट्यामुळे ठेकेदाराने घाईघाईत अडीच ते तीन फुटांची विदेशी रोपे इंजोळे गावातील गायरान गट क्रमांक २७ येथे लावून वनविभागाच्या नियमांची व निकषाची पायमल्ली केली आहे.
प्रकल्प यंत्रणेने वृक्षतोड परवाना दिल्यावर झाडे लावतात की नाही, याची खात्री करावी. झाडे न लावल्यास वृक्ष अधिकारी या नात्याने नियमानुसार कार्यवाही करून अहवाल वनविभागाकडे सादर करावा. -जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग.