प्रशासक कारकिर्दीत अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला भिकेला लावले, महापौर रूपाराणी निकम यांचा घणाघाती आराेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:20 IST2026-03-31T17:20:24+5:302026-03-31T17:20:38+5:30
कामे होणार नसतील तर अधिकाऱ्यांनी घरी जावे

प्रशासक कारकिर्दीत अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला भिकेला लावले, महापौर रूपाराणी निकम यांचा घणाघाती आराेप
कोल्हापूर : शहरात स्वच्छता, कचरा उठाव यासह नागरी समस्या सोडविण्यात महानगरपालिका प्रशासनास अपयश आले आहे. उत्पन्नवाढीसाठी अधिकाऱ्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. पाच वर्षे प्रशासक राजवटीत अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला भिकेला लावले आहे, असा घणाघाती आराेप करतानाच आता कामे होत नसतील तर अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसून करून घ्या. तरीही ऐकणार नसतील तर अधिकाऱ्यांनी थेट घरी जावे, यापुढे तडजोड केली जाणार नाही, असा सज्जड दम महापौर रूपाराणी निकम यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिला. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोरच महापौरांनी ही टीकेची तोफ डागली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन अंदाजपत्रकारवरील चर्चेवेळी महापौरांनी अधिकाऱ्यांना हा दम भरला. नगरसेवक, नागरिक जेव्हा समस्या सांगतात, कामे सांगतात ती आठ दिवसांत पूर्ण केलीच पाहिजेत. शहरात कचरा साचलाय, पाणी वाहतंय, ड्रेनेज तुंबलंय, रस्त्यावरून वाहतंय हे यापुढे चालणार नाही. अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा अहवाल आठ दिवसांनी दिला पाहिजे, तसेच प्रत्येक महिन्यातील दोन तारखेला समस्या आणि त्यावर केलेल्या उपाययोजना याचा अहवाल दिला पाहिजे, असे महापौरांनी ठणकावून सांगितले.