अलमट्टीतील विसर्गाची पूर्वसूचना आधीच मिळणार, १५ ऑगस्टपर्यंत पाणी पातळी ५१७ मीटर ठेवण्याचे कर्नाटकचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:25 IST2025-05-28T12:23:49+5:302025-05-28T12:25:02+5:30

कोल्हापूर, सांगली, बेळगाव, विजापूर प्रशासनाची बैठक

Coordination will be maintained between Maharashtra and Karnataka to deal with possible floods in Kolhapur and Sangli districts during the monsoon season | अलमट्टीतील विसर्गाची पूर्वसूचना आधीच मिळणार, १५ ऑगस्टपर्यंत पाणी पातळी ५१७ मीटर ठेवण्याचे कर्नाटकचे आश्वासन

अलमट्टीतील विसर्गाची पूर्वसूचना आधीच मिळणार, १५ ऑगस्टपर्यंत पाणी पातळी ५१७ मीटर ठेवण्याचे कर्नाटकचे आश्वासन

कोल्हापूर : पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये समन्वय ठेवले जाईल, अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाईल. अलमट्टीतील पाणीपातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७ ते ५१७.५० मीटरदरम्यान राखली जाईल, अशी माहिती कर्नाटक प्रशासनाने मंगळवारी दिली. या विषयावर महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक उद्या गुरुवारी (२९ मे) होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत सांगली, तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पुराचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना व समन्वयावर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे, बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विजापूर जिल्हाधिकारी विजापूर संबित मिश्रा, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, कोल्हापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, सांगलीचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, अलमट्टी धरणाचे प्रमुख अभियंता यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक प्रशासनातील समन्वयातून कोल्हापूर-सांगलीतील पूर रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय झाला. पंचगंगा व कृष्णा नदीतील पाण्याची पातळी, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती, तसेच आंतरराज्य समन्वयातून दोन्ही राज्यांमधील जलस्रोत विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनांनी एकत्र येऊन पूर व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय झाला.

बैठकीतील निर्णय

  • हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे पूर काळात उघडे ठेवणे.
  • कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पाणी अडविण्यासाठीचे दरवाजे पावसाळ्यापूर्वी काढून घेणे.
  • नदीपात्रातील बांध काढून टाकणे.
  • रियल टाइम डेटा बेस यंत्रणा सुरू करणे.
  • पूर काळात चारही जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा एकत्रितपणे काम करतील.


अधिकाऱ्यांची नियुक्ती

धरणातील पाणी पातळीबाबत कर्नाटक राज्यातील दोन्ही जिल्ह्यांचे प्रतिनिधी वारणा, कोयना धरण व राजापूर बंधाऱ्यावर तर सांगलीचे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी अलमट्टी धरणाच्या ठिकाणी समन्वय अधिकारी असतील.

दोन राज्याच्या मुख्य सचिवांची उद्या बैठक

संभाव्य पूर व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक दि. २९ मे रोजी घेण्यात येणार आहे.

Web Title: Coordination will be maintained between Maharashtra and Karnataka to deal with possible floods in Kolhapur and Sangli districts during the monsoon season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.