कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांची गेल्या महापुरातील भरपाई अडकली, प्रशासनाकडे पैसे पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:23 IST2025-05-28T19:23:24+5:302025-05-28T19:23:53+5:30

त्रुटींमुळे अडकली रक्कम

Compensation for the last flood of two thousand farmers in Kolhapur district is stuck, leaving the administration with Rs 1 crore | कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांची गेल्या महापुरातील भरपाई अडकली, प्रशासनाकडे पैसे पडून

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांची गेल्या महापुरातील भरपाई अडकली, प्रशासनाकडे पैसे पडून

कोल्हापूर : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम अजूनही जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांना मिळालेली नाही. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांची ९९ लाख १८ हजार २१० इतकी रक्कम अजूनही जिल्हा प्रशासनाकडे आहे. यंदा मेमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून लोकमतने गेल्यावर्षीच्या नुकसानीचे किती पैसे शेतकऱ्यांना मिळाले याची माहिती घेतली.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे काेल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावरून परतला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकसान भरपाईची रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहे.

मात्र अजूनही १ हजार ९९२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा त्यांच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम झालेली नाही. आता नव्या वर्षातील पावसाळा सुरू झाला. इथे आधीची रक्कम मिळायचा पत्ता नाही यावर्षी काय होणार या विचारानेच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

म्हणून अडकली ई-केवायसी

ई-केवायसी म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार नंबरला जोडून घ्यायचे आहे. पण अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. काही जणांचा आधार नंबर चुकला आहे तर काही जणांचे बँक खाते क्रमांक चुकले आहे. दुरुस्तीचे अर्ज देऊनही ते अपडेट झालेले नाही. अशा विविध कारणांमुळे ई-केवायसी योग्य झालेली नाही, ई-केवायसी नाही म्हणून रक्कम नाही असे हे त्रांगडे आहे.

दृष्टिक्षेपात नुकसान भरपाई..

  • बाधित शेतकरी : १ लाख ०८ हजार ८२९
  • जिल्ह्याला मिळालेली रक्कम : १२२ कोटी ४२ लाख ३७ हजार
  • मंजूर रक्कम : ९४ कोटी ५२ लाख १९ हजार ५३३
  • खात्यावर जमा झालेली रक्कम : ९१ कोटी ६८ लाख ८८ हजार ७६८
  • ई-केवायसी प्रलंबित शेतकरी : १ हजार ९९२
  • प्रलंबित रक्कम : ९९ लाख १८ हजार २१०

Web Title: Compensation for the last flood of two thousand farmers in Kolhapur district is stuck, leaving the administration with Rs 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.