Kolhapur: थंडी, धुक्यात हरवला अंबाबाईचा उत्तरायण किरणोत्सव, गरुड मंडप कमानही अडचणीची
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:00 IST2026-02-03T18:00:06+5:302026-02-03T18:00:49+5:30
चरणस्पर्शही नाही

संग्रहित छाया
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचा अखंड उत्तरायण किरणोत्सव यंदा निराशेत गेला. किरणोत्सवाच्या गेल्या तीन दिवसांत एकदाही मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीपर्यंत पोहोचू शकली नाहीत. या वर्षी थंडी लांबल्याचा हा परिणाम असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यासह नव्याने होत असलेल्या गरुड मंडप कमानीपैकी एक कमान आणि जोडलेली एक पट्टीही किरणोत्सवाच्या अडथळ्याचे कारण ठरणारे आहे.
श्रीअंबाबाईचा किरणोत्सव पाच दिवसांचा असतो. त्यातीन मुख्य तीन दिवस. सोमवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस होता. या पाचपैकी एकादाही मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत पोहोचू शकली नाहीत. सोमवारी तर ही किरणे गरुड मंडपातील सदरेपर्यंतच येऊन लुप्त झाली. नव्या वर्षातील किरणोत्सवात साधा चरणस्पर्शही झाला नाही. यंदा थंडीचा कडाका जास्त होता, शिवाय थंडीचा कालावधीही लांबला. आत्ताही रोज मध्यरात्री थंडी असते. ढगाळ वातावरण, धूलिकण याचा परिणाम सूर्यकिरणांच्या तीव्रतेवर झाला.
कमीनात आत्ताच हवी दुरुस्ती...
यंदा सूर्यकिरणांची तीव्रता नव्हती हे खरेच, पण नव्याने होत असलेल्या गरुड मंडपाची महाद्वारसमोरील कमान किरणांच्या प्रवासात अडथळा ठरत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यासमोर उभे राहून समोर बघितले की, गरुड मंडपाची कमान आणि त्या खाली लावलेली पट्टी दिसत आहे. आत्ता गरुड मंडप उभारणीच्या अवस्थेत आहे, तोपर्यंतच कमान वर उचलून घेणे किंवा त्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. एकदा गरुड मंडप उभारल्यानंतर काही करता येणार नाही.