अजितदादांचा कोल्हापूरकरांशी जिव्हाळा शेवटपर्यंत...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:43 IST2026-01-29T15:43:33+5:302026-01-29T15:43:59+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर केवळ एकमेव आमदार पक्षाचा असतानाही कोल्हापूरला मंत्रिपद

अजितदादांचा कोल्हापूरकरांशी जिव्हाळा शेवटपर्यंत...!
कोल्हापूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांबद्दलचे वेगळे स्थान होते. कोल्हापूरकर आणि पवार कुटुंब यांचे नातं त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवले. त्यांनी हे ऋणानुबंध आपल्या कृतीतून अनेक वेळा दाखवून दिले आहे.
पवार कुटुंबांच्या पाठीशी कोल्हापूरकर कायम राहिले. त्यांच्या प्रत्येक राजकीय भूमिकेच्या वेळी कोल्हापूरच्या जनतेने त्यांना साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही कोल्हापुरातील बहुतांशी पदाधिकारी त्यांच्यासोबत राहिले. त्यांनीही कोल्हापूरला विकास निधी देताना कधी हात आखडता घेतला नाही. त्याचबरोबर, मंत्रिपद देतानाही येथून पक्षाचे आमदार किती आहेत? याची मोजमाप त्यांनी कधी केलीच नाही.
वाचा: कोल्हापूकरांच्या अडचणीला धावणारे 'दादा'; महापूर, कोरोना काळात दिला आधार
कोल्हापूरच्या विकासाचा कोणताही प्रश्न त्यांच्या समोर आला की, तो तातडीने मार्गी लावण्यासाठी त्यांची धडपड कायम होती. विधानसभा निवडणुकीनंतर केवळ एकमेव आमदार पक्षाचा असतानाही त्यांनी हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षणमंत्र्याची जबाबदारी दिली. इतका जिव्हाळा अजित पवार यांचा कोल्हापूरकरांशी होता.
वाचा: अजित पवार यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी
शिस्तप्रिय दादा; कार्यकर्त्यांची भंबेरी
शिस्तप्रिय दादा कोल्हापूर दौऱ्यावर यायचे म्हटले की, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भंबेरी उडायची, हे अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर अनेक वेळा पाहावयास मिळत होते. मेळावा असो किंवा साधी बैठक तिथे सगळे व्यवस्थितच हवे, नाहीतर ते कार्यकर्त्यांना धारेवर धरत होते.