कागल अपघात प्रकरणी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांना पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 11:55 IST2017-12-15T07:35:44+5:302017-12-15T11:55:17+5:30
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने शुक्रवारी पहाटे पुणे-बंगळुरु महामार्गावर एका महिलेला धडक दिली.

कागल अपघात प्रकरणी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांना पोलिसांनी केली अटक
कोल्हापूर - भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने गुरुवारी दुपारी पुणे-बंगळुरु महामार्गावर एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरातील कागल येथे ही घटना घडली. या प्रकरणी कागल पोलिसांनी मधुकर बाबूराव रहाणे (54) यांना अटक केली आहे. आशाताई कांबळे असे मृत महिलेचे नाव असून त्या 67 वर्षांच्या होत्या.
एमएच 03 सीबी 2021हुंडाय आय 20 कारने आशाताई कांबळे यांना धडक दिली. कागल येथे रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या आशाताई कांबळे यांना एका युवकाने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताच्यावेळी नेमके कोण गाडी चालवत होते ते स्पष्ट झालेले नाही. पण अजिंक्यचे वडिल मधुकर बाबूराव रहाणे (54) यांच्या मालकीची ही गाडी असल्याची माहिती आहे. रहाणे सहकुटुंब कोल्हापूरमार्गे मुंबईहून तारकर्लीला चालले असताना कागल येथे हा अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या आय 20 कारने आशाताई कांबळे यांना धडक दिली. दरम्यान आशाताई कांबळे या इचलकंरजीमधील शहापूर येथील सावित्रीनगर येथे रहात होत्या. अपघातामुळे कायदा-सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.