Kolhapur: खेळ कुणाला दैवाचा कळला, दैवलेख ना कधी कुणा टळला..!; बळ्ळारीत आईसह तीन मुलींचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:13 IST2025-06-21T18:12:30+5:302025-06-21T18:13:32+5:30
म्हणूनच अभिषेक सुदैवाने बचावला

Kolhapur: खेळ कुणाला दैवाचा कळला, दैवलेख ना कधी कुणा टळला..!; बळ्ळारीत आईसह तीन मुलींचा बुडून मृत्यू
राम मगदूम
गडहिंग्लज : ‘खेळ कुणाला दैवाचा कळला, दैवलेख ना कधी कुणा टळला’ या गाण्याची आठवण करून देणारी हृदयद्रावक घटना बळ्ळारी जिल्ह्यात घडली. गडहिंग्लज तालुक्यातील मेंढपाळ महिलेचा तीन मुलींसह शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेमुळे हसूरचंपू गावावर शोककळा पसरली आहे. सिद्धम्मा उर्फ लक्ष्मी संजय कुरणे (वय २८), अभिग्नी (७), अवनी (५), आर्या (३) अशी मृतांची नावे आहेत.
हकिकत अशी, हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील संजय उर्फ कुमार याचा हिडकल डॅमनजीकच्या होसूर (ता. हुक्केरी) येथील सिद्धम्माशी १२ वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना अभिषेक, अभिग्नी, अवनी व आर्या अशी चार मुले आहेत.
मेंढपाळ व्यवसायामुळे ते बळ्ळारी परिसरातच फिरत असतात. सध्या आंद्याळ येथे त्यांच्या बकऱ्यांचा तळ आहे. त्यांचे सासरे सिद्धाप्पा करी यांची बकरीही त्याच परिसरात आहे. मंगळवारी (दि. १७) कुमार हे आई व आजीसह बाजारासाठी बळ्ळारीला गेले होते. त्यानंतर सिद्धम्मा तीनही मुलींना सोबत घेऊन बकरी चारायला गेली होती. बाजाराहून आल्यानंतर कुमारला तळावर मुली दिसल्या नाहीत. त्यांना आणण्यासाठी कुमार आपल्या बकऱ्यांचा शोध घेत होता.
सायंकाळी एका मेंढपाळाला बकऱ्यांचा कळप दिसला मात्र, त्यामागे कुणीही नसल्याने त्याने त्या बकऱ्यांना आपल्या कळपात सामावून घेतले व आजूबाजूच्या मेंढपाळांना कल्पना दिली. दरम्यान, ‘त्या’ शेततळ्यात लहान मुलगी तरंगताना दिसली. त्यावरून शोध घेतला असता सिद्धम्मा व तिच्या मुली मृतावस्थेत आढळल्या. पाण्यात बुडाल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
अभिषेक बचावला
गडहिंग्लज येथे शिकणारा अभिषेक मेच्या सुट्टीत बळ्ळारीला गेला आहे. तू तळावरच थांब, थोड्या वेळाने तुझ्या बहिणींनाही पाठवून देतो, असे सांगून सिद्धम्मा मुलींसह बकरी चारायला गेली. म्हणूनच अभिषेक सुदैवाने बचावला.
कुमारविरुद्ध तक्रार
कुमारच्या छळामुळेच सिद्धम्माने मुलींसह आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने कुरूगोडू पोलिस ठाण्यात दिल्यामुळे त्याला अटक झाली आहे.
तुम्ही बाजारला जा.. मी बकऱ्यांना चारवून आणतो
मुलांना कपडे, दप्तर व स्वयंपाकासाठी चार नवीन भांडी आणा, बकऱ्यांना औषध आणण्यासाठी तुम्ही बाजारला जा. मी बकरी चारवून आणते, असे सांगून सिद्धम्माने कुमारला बाजाराला पाठवले होते.
नातेवाईक चक्रावले
पस्तिशीतील कुमार हा अशिक्षित असून लहानपणापासून बकऱ्यांतच आहे. दोन वर्षांपूर्वी बकऱ्यांसह तो जन्मगावी हसूरचंपूला आला होता. परंतु, येथील हवामान न मानवल्याने १५ ते २० बकऱ्या दगावल्यामुळे तो पुन्हा बळ्ळारीला गेला. पुन्हा ५० नवीन बकऱ्यां घेतल्या होत्या. कुठलेही कर्ज किंवा भांडणाचे कारण नसतानाही घडलेल्या या घटनेमुळे त्यांचे नातेवाईकही चक्रावून गेले आहेत.
जगात देव आहे असे म्हणू तरी कसे ?
गडहिंग्लज : लहानपणापासूनच बकऱ्यांत गेल्यामुळे कुमार अजिबात शिकला नाही. किमान त्याच्या मुलांना तरी शिकवावे, अशी माझी इच्छा होती. परंतु, देवाने आमच्यावर इतकी वाईट वेळ का आणली? जगात देव आहे असे म्हणू तरी कसे? असा हृदय पिळवटून टाकणारा सवाल कुमारची येथील बहीण पारूबाई हुलगण्णावर यांनी केला.
स्वत: अशिक्षित आणि दुसऱ्या घरची धुणी-भांडी करून चरितार्थ चालविणाऱ्या पारूबाईला शिक्षणाविषयी प्रचंड प्रेम आहे. कुमारचा मुलगा अभिषेक तिच्याकडेच शिकायला असून मुलींनाही शिक्षणासाठी गडहिंग्लजलाच आणण्याची तिची तीव्र इच्छा होती. कुमारची चारही मुलं बकऱ्यांच्या तळावरच जन्माला आली. त्यांचे जन्मदाखले, रेशनकार्ड, आधारकार्ड उपलब्ध नाहीत. त्यामुळे गोकाकच्या कोर्टातून जन्माचा दाखला आणून अभिषेकला येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात घातले. अभिग्नी व अवनीच्या प्रवेशासाठीही शाळेत भेटून आली होती.
सहावीपर्यंत कानडी शिकलेली सिद्धम्मा खूप गुणी व कष्टाळू होती. आपल्यासारखं बकऱ्यांच्या मागं फिरायची वेळ मुलांवर येऊ नये म्हणून मुलांनी खूप शिकावं, अशी तिचीही इच्छा होती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत बुधवारी मुलांना शाळेत घेऊन येतो, असे पारूबाईने मुख्याध्यापक देसाई गुरुजींना सांगितले होते. मात्र, त्यांच्या इच्छेवर काळाने पाणी फिरवले.
पदवीनंतर शिक्षणशास्त्राची पदविका घेतलेला कुमारचा भाऊ मंजुनाथ हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. मंजुनाथ व पारूबाई यांच्यावर कुमारचा प्रचंड विश्वास आहे. त्यांना विचारल्याशिवाय तो कुठलेही काम करत नाही. कुमार आणि सिद्धम्मा यांच्यात कधीही भांडण-तंटा झाल्याचे आठवत नाही, असेही पारूबाईंनी सांगितले.