टायर फुटून इथेनॉलच्या टँकरला भीषण आग, गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:57 IST2026-02-11T11:57:33+5:302026-02-11T11:57:56+5:30
अग्निशमनच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

टायर फुटून इथेनॉलच्या टँकरला भीषण आग, गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर घटना
कोल्हापूर : कोल्हापूर - गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर साळवणनजीक असणाऱ्या वळणावर कागलच्या शाहू कारखान्यातून इथेनॉल भरून गोव्याच्या दिशेने निघालेल्या टँकरला टायर फुटून घर्षणाने भीषण आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. १०) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा टँकर ४० हजार लिटर इथेनॉल भरून गोव्याच्या दिशेने निघाला होता. साळवण-मार्गेवाडीनजीक टायर फुटल्याने प्रचंड घर्षणाने ठिणगी पडून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अल्पावधीत आगीने रौद्ररूप धारण केल्याने धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले होते. यामुळे प्रारंभी स्फोट होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोल्हापूर येथील मार्केट यार्ड, अग्निशमन दल तसेच छत्रपती शाहू साखर कारखान्याची अग्निशमन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, आग नियंत्रणात आल्यानंतर टँकरमधून इथेनॉलची गळती सुरू झाल्याने धोका कायम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर - गगनबावडा मार्गावरील वाहतूक वेतवडे - अणदूरमार्गे वळविण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच गगनबावडा व कळे पोलिस ठाण्याचे अधिकारी, तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, छत्रपती शाहू साखर कारखान्याचे डिस्टिलरी मॅनेजर नितीन पाटील तसेच अग्निशमन विभागाचे जयवंत खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
चालकाचे प्रसंगावधान
आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टँकर तत्काळ रस्त्याच्या कडेला उभा केला आणि १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचारण केले. वेळेत अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
अजूनही धोका कायम
आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलास यश आले असले तरी अखेरच्या क्षणी इथेनॉलची गळती चालू झाल्याने अद्यापही धोका कायम असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक वेतवडे-अणदूरमार्गे वळविण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत टँकरमधील इथेनॉल दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षित हलविण्याचे काम चालू होते.