खेळताना उचकी लागून बेशुद्ध पडलेल्या बालिकेचा मृत्यू, कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:29 IST2026-03-27T16:28:52+5:302026-03-27T16:29:03+5:30
अचानक घडलेल्या दुर्घटनेने नातेवाइकांना धक्का बसला

खेळताना उचकी लागून बेशुद्ध पडलेल्या बालिकेचा मृत्यू, कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथील दुर्दैवी घटना
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे राहत्या घरात खेळताना उचकी लागून बेशुद्ध पडलेल्या बालिकेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अनन्या प्रकाश बंडरोळी (वय ४) असे मृत बालिकेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
सीपीआर मधील पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बंडरोळी हे मूळचे कर्नाटकातील असून, ते बांधकामासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली पुरवतात. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे ट्रॅक्टर घेऊन कामासाठी गेले होते. त्यांच्या पत्नीसह मुलगी अनन्या, भावाची मुले घरी होती. दुपारी बाराच्या सुमारास भावंडांसोबत खेळणारी अनन्या अचानक उचकी येऊन बेशुद्ध पडली.
हा प्रकार लक्षात येताच तिला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तिला यापूर्वी कोणताही आजार नव्हता. अचानक घडलेल्या दुर्घटनेने नातेवाइकांना धक्का बसला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.