Kolhapur ZP Election: महायुतीतच संघर्ष उफाळणार; एकीची चर्चा, परंतु बेकीचीच शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:59 IST2026-01-19T19:58:27+5:302026-01-19T19:59:49+5:30
भाजप, महायुतीच्या दोन बैठका

Kolhapur ZP Election: महायुतीतच संघर्ष उफाळणार; एकीची चर्चा, परंतु बेकीचीच शक्यता
कोल्हापूर : महापालिकेत एकत्रित लढलेल्या महायुतीमध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी संघर्ष उफाळणार आहे. रविवारी येथील एका हॉटेलवर भाजपच्या आणि महायुतीच्या नेत्यांच्या दोन स्वतंत्र बैठका झाल्या. यावेळी प्रत्येक तालुक्यातील स्थिती जाणून घेण्यात आली असली तरी बहुतांशी तालुक्यात तिघेही एकत्र येण्याची शक्यताही कमी असल्याचेच या बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे औपचारिकता म्हणून जिल्ह्याची आणि प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र समिती स्थापन करून आज सोमवारी दुपारपर्यंत अहवाल मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहानंतर भाजपच्या बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीत बाराही तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्या त्या तालुक्यातील राजकीय स्थिती मांडताना भाजपला किती जागा मिळाव्यात याची मांडणी केली. २०१७ ला भाजपच्या चिन्हावर १४ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचे तीन आणि प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीचे दोन अशा गेल्यावेळच्या भाजपला १९ जागा पाहिजेतच. तसेच चंदगड तालुक्यातील ४, राधानगरीमधील दोन, भुदरगडमधील एक, कागलमधील तीन, करवीरमधील दोन आणि शाहूवाडी, गगनबावड्यातील प्रत्येकी एक अशा जादाच्या १४ जागांची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमूआण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, संजयबाबा घाटगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर याच ठिकाणी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. भाजप नेत्यांसह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, भैय्या माने, समित कदम, विजयसिंह माने उपस्थित होते. प्रत्येक नेत्यांनी गेल्यावेळी आपापल्या मतदारसंघातून किती जागा कोणत्या पक्षाला होत्या या माहितीची देवाणघेवाण करत त्या त्या जागांची पुन्हा मागणी करत जादा जागांवरही दावा करण्यास सुरुवात केली.
दोन समित्यांची स्थापना
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी महायुतीच्यावतीने पालकमंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ, खासदार महाडिक, आमदार कोरे यांची जिल्हास्तरीय समिती स्थापना करण्यात आली. तर प्रत्येक पक्षाचा तालुक्याचा प्रमुख घेत त्रिसदस्यीय समिती प्रत्येक तालुक्याला स्थापन करण्यात आली. या समितीने आज सोमवारी दुपारपर्यंत त्या त्या ठिकाणची परिस्थिती, कसे जागा वाटप होऊ शकते याचा अहवाल द्यायचा असे निश्चित करण्यात आले.