तुळशी धरण काठोकाठ,धरणातून २५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:37 IST2020-09-03T16:34:36+5:302020-09-03T16:37:18+5:30
श्रीकांत ऱ्हायकर धामोड- गेल्या कित्येक वर्षात जुलैचा शेवटचा आठवडा किंवा फार तर ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा तुळशी प्रकल्प भरण्यास ...

धामोड ( ता. राधानगरी) येथील तूळशी जलाशयाच्या वक्र दरवाजातून सोडण्यात आलेले पाणी. ( छाया-श्रीकांत ऱ्हायकर)
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड- गेल्या कित्येक वर्षात जुलैचा शेवटचा आठवडा किंवा फार तर ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा तुळशी प्रकल्प भरण्यास या वर्षी सप्टेंबर उजाडला. बुधवारी पहाटे ३.३० वाजता प्रकल्पाच्या ६१६.९१ मीटर या पूर्ण संचय पाणीपातळीने टप्पा गाठला. त्यामुळे धरण१०० टक्के भरले. परीणामी सकाळी धरणाच्या तीन का दरवाजातून २५३ क्यूसेक्सने पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीकाठावरील लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन विजय आंबोळे यांनी केले आहे.
धामोड( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयामध्ये पुरनियंत्रणाच्या अनुशंघाने दमदार पाऊस होऊनही पुर्ण पाणी संचय केला जात नव्हता. धरणातून वारंवार पाणी सोडण्यात येत होते.परीणामी धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. पण गेल्या आठ दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला होता. गेल्या आठ दिवसात धरणातील उपलब्ध पाणी व बाहेरून येणारे पाणी यामुळे बुधवारी पहाटे ३ .३० वाजता धरण पूर्ण संचय पाणीपातळी टप्पा पूर्ण झाला.
आता धरण शंभर टक्के भरले असून धरणातून २५३ क्युसेक्स इतके पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले आहे . सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाऊस अचानक सुरू झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने तुळशी नदी काठावरील लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन तुळशी धरणाचे शाखा अभियंता विजय आंबेळे यांनी केले आहे.