लग्नाच्या पत्रिकेवर छापलं भावाचं नाव पण स्वत:च घेतले सात फेरे, सत्य समजलं अन् पोलीसही चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 16:11 IST2023-02-16T16:10:23+5:302023-02-16T16:11:13+5:30
लग्नाबाबत तरूणाने 'फुल प्रूफ प्लॅन' केला होता, पण...

लग्नाच्या पत्रिकेवर छापलं भावाचं नाव पण स्वत:च घेतले सात फेरे, सत्य समजलं अन् पोलीसही चक्रावले!
Fake Marriage Scenes: पंजाबमधील अबोहर जिल्ह्यातील कलरखेडा गावातून एका व्यक्तीने फिल्मी स्टाईलने प्लॅन तयार करून सर्वांना फसवून दुसरं लग्न केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं सुरू असताना पहिली पत्नी आल्यावर मात्र त्याला सुरू असलेलं लग्न थांबवावं लागलं आणि नवरदेवाला पोलीस आपल्या सोबत घेऊन पोलीस ठाण्यात गेले. पहिलं लग्न झालं असल्याने, जलालाबादच्या अरैयनवाला (मोहकमवाला) गावातील एक तरुण पूर्ण तयारीनिशी दुसरं लग्न करण्यासाठी अबोहरच्या कल्लारखेडा गावात पोहोचला होता. त्यासाठीच त्याने प्लॅन केला होता, पण तरीही तो पकडला गेलाच.
लग्नात धाकट्या भावाच्या नावाने छापली पत्रिका
लग्नपत्रिकेवर धाकट्या भावाचे नाव छापण्यात आले होते. म्हणजेच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची वेळ आलीच तरी त्या भावाला पुढे करून कारवाईतून वाचता येईल. पण तसे झाले नाही. इकडे याचे दुसरे लग्न पार पडले आणि पहिली पत्नी आपल्या कुटुंबीयांसह घटनास्थळी पोहोचली. नंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलीस स्टेशन खुईया सरवर यांनी दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला. माहिती देताना आरोपीची पहिली पत्नी कुलदीप कौर आणि तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, २०१९ मध्ये तिचे लग्न जलालाबाद गावातील अरायनवाला (मोहकमवाला) येथील सुखविंदर सिंग याच्याशी झाले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांना मुलगीही झाली.
पहिल्या पत्नीशी भांडण झाल्यानंतर पुढे...
गेल्या काही दिवसांपासून कुलदीप कौरचे पतीसोबत भांडण होत होते. यामुळे ती काही काळ तिच्या माहेरी राहत होती. या दरम्यान त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितले की, सुखविंदर सिंग दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. त्यामुळे ती तिच्या कुटुंबियांसह अबोहरच्या कल्लारखेडा गावात पोहोचली, तिथे लग्नाचा मंडप सजवण्यात आला आणि वराने फेरे घेतले. यानंतर त्याने संपूर्ण हकीकत मुलीला सांगितली. हे सांगितल्यानंतर लग्नाचे विधी थांबवून पोलिसांना पाचारण करण्यात आले. दुसरीकडे चौकी कल्लारखेडाचे एएसआय दिवेंद्र सिंग यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. दोन्ही पक्षांना बोलावून निवेदने घेण्यात आली आहेत. त्यानुसार आता कारवाई होणार आहे.
फसवण्याचा प्रयत्न केला पण...
हा सगळा प्रकार उघडकीस येताच वराने भावाचे लग्न झाल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. वराच्या या कृत्यामुळे मुलीचे कुटुंबीयही खवळले. काहीतरी काळंबेरं आहे हे सगळ्यांना समजायला वेळ लागला नाही. आपली मुलगी भामट्याच्या तावडीत अडकण्यापासून वाचल्याबद्दल मुलीच्या पालकांनी पोलीसांचे आभार मानले.