आजच्याच दिवशी झालेला अपघात; 213 प्रवाशांसह Air India च्या विमानाने घेतली जलसमाधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:01 IST2025-01-01T15:00:43+5:302025-01-01T15:01:20+5:30
मुंबईहून दुबईला निघालेले विमान अवघ्या 101 सेकंदात अरबी समुद्रात बुडाले.

आजच्याच दिवशी झालेला अपघात; 213 प्रवाशांसह Air India च्या विमानाने घेतली जलसमाधी
Air India Crash: आज 2025 चा पहिला दिवस, नववर्षात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते. पण, आजच्याच दिवशी भारताच्या इतिहासात एका दुःखद घटनेची नोंदली झाली आहे. आजच्याच दिवशी, म्हणजेच 1 जानेवारी 1978 रोजी 213 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्याविमानाने समुद्रात जलसमाधी घेतली होती. सम्राट अशोक नावाच्या बोईंग 747 विमानाने बॉम्बे (आता मुंबई) आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केली अन् तांत्रिक बिघाडामुळे ते समुद्रात क्रॅश झाले. विमानात 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्स होते.
मुंबईहून दुबईला निघालेले विमान
भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हवाई अपघात आहे. घटनेनंतर विमान जाणूनबुजून पाडल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र समुद्रात सापडलेल्या विमानाच्या अवशेषाच्या तपासणीत हा अपघात असल्याचे सिद्ध झाले. 1 जानेवारी 1978 रोजी एअर इंडियाच्या बोईंग 747 ने मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावरून (आताचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण केले. टेक ऑफ केल्यानंतर विमान अचानक डावीकडे झुकले.
अवघ्या 101 सेकंदात समुद्रात जलसमाधी
विमानाच्या उंचीचा अंदाज लावण्यात कॅप्टनने चूक केली अन् विमान वेगाने खाली आले. उड्डाणानंतर अवघ्या 101 सेकंदात विमान अरबी समुद्रात कोसळले. या घटनेत विमानातील सर्व 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. या विमानाचे कॅप्टन मदन लाल कुकर होते, जे त्यावेळी 51 वर्षांचे होते. तपासानंतर विमानात कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे पुरावे मिळाले नाही.