जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; चक्कर येऊन पडल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू
By चुडामण.बोरसे | Updated: May 6, 2024 00:39 IST2024-05-06T00:37:43+5:302024-05-06T00:39:37+5:30
ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; चक्कर येऊन पडल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू
भूपेंद्र मराठे, लोकमत न्यूज नेटवर्क, पारोळा (जि. जळगाव): जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. या कडक उन्हाने रविवारी जिल्ह्यात पहिला बळी घेतला. उष्माघातामुळे करमाड, ता. पारोळा येथील अर्जुन भगवान पाटील (६८) या शेतकऱ्याचा चक्कर येऊन पडल्याने शेताच्या बांधावरच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली.
शेतकरी अर्जुन पाटील हे रविवारी सकाळी करमाड शिवारातील आपल्या शेतात गेले होते. तिथे बांधावर काम करीत असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना लागलीच पारोळा येथील कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रवींद्र भगवान पाटील (५०) यांनी फिर्याद दिली. त्यावरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अर्जुन पाटील यांना उष्माघाताचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
- डॉ. सुनील पारोचे, सहायक वैद्यकीय अधिकारी, कुटीर रुग्णालय, पारोळा.