मोताळ्याजवळ चारचाकी वाहन पलटल्याने जामनेरचा चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 18:33 IST2017-11-10T18:26:37+5:302017-11-10T18:33:04+5:30
साखरपुड्याला जात असताना झालेल्या अपघातात आठ जखमी

मोताळ्याजवळ चारचाकी वाहन पलटल्याने जामनेरचा चालक ठार
आॅनलाईन लोकमत
जामनेर,दि.१० : साखरपुड्यासाठी जात असलेल्या जामनेर येथील चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने मोताळा (जि.बुलढाणा)जवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजता अपघात झाला. त्यात चालक शाहरूख शेख खालीद (वय-२२) हा ठार झाला तर वाहनातील आठ जण जखमी झाले आहेत. एक जण गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
जामनेर शहरातील मलिकनगर भागात राहणाºया शाहरूख शेख बशीर याचा साखरपुडा मोताळा जवळील खरबडी येथे असल्याने त्याचे मित्र सकाळी दहा वाजता चारचाकी वाहनाने निघाले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाचे मागील टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. त्यात चालक शाहरूख शेख खालीद (रा.जामनेर) हा ठार झाला. तर शेख खालीद शेख शौकत, रहिम शाह नदीर शाह, शेख नदीम शेख नईम, शेख नसीम शेख बसीर, शेख शाजीद शेख बुढन यांच्यासह आठ जण जखमी झाले आहेत. अपघातात शेख शाहरूख शेख रफिक हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
मयताचा दहा दिवसांपूर्वी साखरपुडा
अपघातातील मयत शाहरूख शेख खालीद हा मदीना नगरातील रहिवासी आहे. त्याचा दहा दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. अपघाताची माहिती शहरात समजताच मदिना नगर, मलिक नगर, घोडेपीर नगर भागात शोककळा पसरली. शुक्रवारची नमाज असल्याने या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सर्व समाजबांधव अराफत चौकात जमा झाले.काही नागरिकांनी मोताळा येथे धाव घेतली.