‘अवकाळी’ची ५५२ हेक्टर क्षेत्राला नुकसानीची कळ! महिला जखमी, तीन तालुक्यातील ११२६ शेतकरी बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 19:41 IST2023-11-27T19:41:27+5:302023-11-27T19:41:49+5:30
रविवारी वादळ आणि गारपिटीसह जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर या तीन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

‘अवकाळी’ची ५५२ हेक्टर क्षेत्राला नुकसानीची कळ! महिला जखमी, तीन तालुक्यातील ११२६ शेतकरी बाधित
जळगाव : गारपीट आणि वादळासह रविवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले आहे. वीज पडल्याने एक महिला जखमी झाली आहे. दोन गायींसह एक म्हैसदेखिल वीज पडल्याने ठार झाली आहे. एका दिवसाच्या अवकाळी पावसाने ११२६ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
रविवारी वादळ आणि गारपिटीसह जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर या तीन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
भडगावची महिला जखमी
भडगाव तालुक्यातील आडळसे येथील प्रतीक्षा गणेश साळुंखे ही महिला वीज पडल्याने जखमी झाली आहे. तर, सत्रासेन (चोपडा) येथील सुभाष संजय पाटील आणि मुक्ताईनगरच्या घोडसगावमध्ये एका घराचे अंशत: नुकसान झाले आहे.
पशुधनांचा बळी
वीज पडल्याने सामरोद (जामनेर) येथील सुनील धनराज पाटील यांच्या मालकीची एक म्हैस जागीच ठार झाली. तर चाळीसगावच्या शिरसगावात निंबा भिकन चव्हाण यांच्या मालकीच्या दोन गायींचा मृत्यू झाला आहे.
पिकांचे नुकसान
पाचोऱ्यातील ३, चाळीसगावची १० आणि जामनेरच्या ४२ गावांना या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात ५५ गावांना फटका बसला आहे.
तालुकानिहाय पिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये) -
तालुका-हरभरा-गहू-मका-ज्वारी-कांदा-भाजीपाला-केळी-पपई-फळपिके
पाचोरा-००-००-००-००-००-००-०४-००-०३
चाळीसगाव-३८-३९-७८-७५-२१६-००-००-००-००
जामनेर-२३-२१-१७-११-००-०७-१४-००-०६
दृष्टीक्षेपात नुकसान
बाधीत गावे-५५
बाधीत शेतकरी-११२६
नुकसान क्षेत्र (हे)-५५२
जनावरांचा मृत्यू-०३
घरांची पडझड-०२
जखमी-०१