जिल्ह्यातील नागरिकांना २१ कोटीचा आॅनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:46 PM2020-08-01T12:46:18+5:302020-08-01T12:57:56+5:30

सुनील पाटील । जळगाव : इंटरनेटवरुन होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल अ‍ॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ ...

21 crore online bribe to the citizens of the district | जिल्ह्यातील नागरिकांना २१ कोटीचा आॅनलाईन गंडा

जिल्ह्यातील नागरिकांना २१ कोटीचा आॅनलाईन गंडा

Next

सुनील पाटील ।
जळगाव : इंटरनेटवरुन होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल अ‍ॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. जिल्ह्यात दीड वर्षात आॅनलाईन फसवणुकीचे ७२ गुन्हे दाखल झाले असून त्यात २० कोटी ९३ लाख ८ हजार ६७० रुपयांचा गंडा नागरिकांना घालण्यात आला आहे. सर्वाधिक फसवणूक ही बॅँकीग क्षेत्राशी संबंधित आहे. यात सहा गुन्हे उघडकीस आले असून त्यात ४ कोटी १६ लाख ७ हजार ७७६ रुपये वसूल करण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.
जिथे पैसा, तिथे धोका हे तत्त्व सायबर गुन्ह्यांमध्येही दिसून येत आहे. ई-शॉपिंग, आॅनलाइन बँकिंग, मोबाइल अ‍ॅपमधून होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारांतून मोठ्या प्रमाणात पैसे हडप केले जात असून त्यामुळेच सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षात ५८ तर जानेवारी ते जून २०२० या कालावधीत १४ असे एकूण ७२ गुन्हे आॅनलाईन गुन्हे दाखल झाले, त्यात २५ गुन्हे सोशल मीडियाचे आहेत.

पोलीस व बॅँकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष
बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड, इमेल याचा पिन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये, असे बँकांसह सायबरतज्ज्ञ, पोलीस यंत्रणा यांच्याकडून वांरवार सांगण्यात येते, परंतु बँकेतून कॉल आल्याचे भासवणाºया भामट्यांवर अतिविश्वास ठेवला जात असून ग्राहकांना तेच भोवते. लोकांचा अ‍ॅपवर, बँकेच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याने त्याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नसल्याचेही उघड झाले आहे.

पोलिसी मर्यादांचा गुन्हेगार घेतात गैरफायदा
गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोबाइलची मदत होते. मात्र पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी गुन्हेगार बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेल्या सिमकार्डचा वापर करतात. सीमकार्ड ज्याच्या नावे आहे त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचतात. मात्र गुन्ह्यात त्याचा काहीच सहभाग नसतो. आॅनलाइनवरुन फसवणूक करुन आलेली रक्कम बँकेत वळती करण्यासाठी एखाद्या गरीब व्यक्तीस सोबत घेतले जाते. त्याच्या नावावर रक्कम वळती करुन त्यास कमिशनपोटी काही रक्कम दिली जाते. या बँक खातेदारांपर्यंत पोलीस पोहोचतात परंतु सूत्रधार वेगळाच असतो.

अशी आहे गुन्ह्याची पध्दत
लॉटरी लागल्याचा अचानक येणारा इमेल, विम्याची रक्कम, नोकरीची संधी, दामदुप्पट रक्कम, कर्ज मंजूर करुन देणे, क्रेडीट व डेबीट कार्ड बंद झाल्याचे सांगणे, लष्करातील कार विक्री करणे, एटीएमचा ओटीपी, विमा कंपनीत गुंतवणूक आदी मोहाच्या सापळ्यात शेकडो जण अडकतात.अशी रक्कम आपल्याला का आणि कोण देणार याचा विचार केला जात नाही. त्यासाठी ओटीपीपासूनची माहिती लगेचच पुरविली जाते. नंतर मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

सर्वच आरोपी परप्रांतीय; लॉकडाऊनमुळे अडचणी
सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक आरोपी हे दिल्ली, राजस्थान, झारखंड, कोलकाता या राज्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने रेल्वे, बस व विमान सेवा बंद आहे. त्यामुळे आरोपी निष्पन्न होऊनही त्यांच्यापर्यंत जायला अडचणी निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊनच्या आधी सहा गुन्हे उघड झाले असून या गुन्ह्यात ४ कोटी १६ लाख ७ हजार ७७६ रुपये वसूल करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

ज्येष्ठ नागरिकाला पावणे दोन कोटीचा गंडा
ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलवरुन ई-व्यवहार करताना त्यातील खाचाखोचा ठाऊक नसतात. भामटे त्याचाच फायदा उठवितात. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाणे अडचणीचे होते. बºयाचदा एकटेदुकटे ज्येष्ठ नागरिक ई-व्यवहारात फसविले जातात. ई-साक्षरतेचा अभाव घातक ठरु शकतो. त्या अज्ञानामुळे हे भामटे आयुष्यभराची पुंजी पळवून नेतात. अमळनेरात एका बॅँक अधिकाºयाला असाच लाखो रुपयात गंडा घालण्यात आला तर मुक्ताईनगर तालुक्यातील एका शेतकºयाला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. कमी व्याजाने कर्ज व म्युचअल फंडात गुंतवणुकीच्या नावाखाली ही फसवणूक झाली आहे.

मानवी कल लक्षात घेऊन गुन्हेगारांची चलाखी
गुन्हेगारांकडे काही वेगळे, अद्ययावत वा नवीन तंत्रज्ञान नसते. परंतु ते मानवी कल लक्षात घेऊन सापळा रचतात. त्यात इमेल, अ‍ॅप, लिंक, बोगस कॉल सेंटर वगैरे सापळे रचले जातात. बँकेमधून फोन आल्याचे भासवणाºया भामट्यांकडे आपल्या खात्याचा बºयापैकी तपशील असतो. बँकांकडून पुरविल्या जाणाºया क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाच्या सुरुवातीचे काही क्रमांक सारखेच असतात. हे भामटे तेच क्रमांक सांगतात आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो. वेगवेगळ्या आॅफर वगैरेच्या नावाखाली मोबाइल क्रमांक घेतले जातात. यातून मोबाइलचा डेटा मोठ्या प्रमाणात जमा होऊन त्याची विक्री होते. म्हणूनच वेगवेगळ्या कंपन्या, बँकांच्या एजन्सीकडून सारखे फोन येतात.

आॅनलाईन व्यवहार काही सेकंद, मिनिटांचा असतो.आॅनलाइन ठगांकडून ही रक्कम एटीएमवरुन काढून घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकदा ही रक्कम काढली गेली की त्याचा तपास करणे अवघड ठरते, त्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियावर वावरताना विशेष काळजी घ्यावी. त्यावर लाइव्ह लोकेशन, खासगी माहिती, फोटो शेअर करु नयेत. या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सावधगिरी बाळगावी हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक,सायबर पोलीस स्टेशन

Web Title: 21 crore online bribe to the citizens of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.