टोमॅटोला मिळेना भाव, उत्पादन खर्चही निघेना; शेतकऱ्याने २६ क्विंटल टोमॅटो फेकला रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:05 IST2026-03-26T13:04:07+5:302026-03-26T13:05:15+5:30
वाहतुकीचा खर्चही निघेना, जालन्यात प्रयोगशील शेतकऱ्याने १०८ कॅरेट टोमॅटो रस्त्यावर ओतले

टोमॅटोला मिळेना भाव, उत्पादन खर्चही निघेना; शेतकऱ्याने २६ क्विंटल टोमॅटो फेकला रस्त्यावर
जालना : कष्टाने पिकवलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रयोगशील शेतकरी अमर विजय काकडे यांनी भाव नसल्याने २६ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले असून, यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अमर काकडे यांची चार एकर शेती असून, ते नेहमीच शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. यापूर्वी त्यांनी द्राक्ष बाग लावली होती, मात्र निसर्गाची अवकृपा आणि संकटांची मालिका पाहता त्यांनी द्राक्ष बाग काढून टाकली. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी त्यांनी मोठ्या आशेने एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, आता टोमॅटोने ही त्यांच्या पदरी निराशाच टाकली आहे. टोमॅटो विक्रीसाठी नेल्यानंतर आलेला अनुभव सांगताना काकडे भावुक झाले. टोमॅटो लागवडीसाठी एकरी जवळपास ५० हजार रुपये खर्च आला. एक कॅरेट तोडून बाजारात नेण्यासाठी ५० रुपये खर्च येतो. परंतु, बाजारात एका कॅरेटला केवळ ३० रुपये भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक खर्चही खिशातून भरला
बाजारपेठेत आडत, हमाली आणि तोडणीचा खर्च पाहता, स्वतःच्या श्रमाचे मूल्य शून्य ठरत आहे. १०८ कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी नेले होते, पण साधी वाहतूकही खिशातून भरावी लागत असल्याने अखेर तो टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली.
- अमर काकडे, उत्पादक शेतकरी
प्रयोगशीलतेला हवी मार्गदर्शनाची साथ
शेतीमध्ये सातत्याने प्रयोग करूनही योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. आता ही आर्थिक कोंडी सुटणार कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ उत्पादन वाढवून चालणार नाही, तर प्रयोगशील शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गणित आणि योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.