वटपौर्णिमेदिवशीच काळाने हिरावलं कुंकू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:42 IST2025-06-11T09:41:19+5:302025-06-11T09:42:13+5:30
Jalana News: शेतात काम करणाऱ्या युवकासह त्यांच्या दोन मुलांचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना वरूड (ता. जालना) येथे वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. पतीसह मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच मृताच्या पत्नीने एकच टाहो फोडला.

वटपौर्णिमेदिवशीच काळाने हिरावलं कुंकू
जालना - शेतात काम करणाऱ्या युवकासह त्यांच्या दोन मुलांचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना वरूड (ता. जालना) येथे वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. पतीसह मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच मृताच्या पत्नीने एकच टाहो फोडला. ‘भाऊ, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुम्ही लवकर या’, अशी साद फोनवर वडिलांना घालत रडणाऱ्या तिला पाहून गावकऱ्यांचे डोळेही पाणावले होते. विनोद तुकाराम म्हस्के (वय ३०), श्रद्धा विनोद म्हस्के (११), समर्थ विनोद म्हस्के (८) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.
मुलं गेली होती पाणी घेऊन
विनोद म्हस्के हे मंगळवारी सकाळी शेतात भेंडी लावण्यासाठी मल्चिंगचे काम करण्यासाठी गेले होते. श्रद्धा आणि समर्थ हे दोघे त्यांना पाणी देण्यासाठी गेले होते. वडील खाली पडलेले पाहून त्यांनी वडिलांना स्पर्श केला आणि त्यांनाही विजेचा धक्का लागला, असे नातेवाइकांनी सांगितले.
गावकऱ्यांनी धाव घेत वीजपुरवठा बंद करून तिघांनाही जालना येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती तिघांना मृत घोषित केले.