इतका विश्वासघाती या पृथ्वीतलावर जन्मू शकत नाही; धस-मुंडे भेटीवर मनोज जरांगे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 19:47 IST2025-02-14T19:47:22+5:302025-02-14T19:47:39+5:30
'तुम्हाला त्यांचे तोंड बघायची गरज काय होती? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.'

इतका विश्वासघाती या पृथ्वीतलावर जन्मू शकत नाही; धस-मुंडे भेटीवर मनोज जरांगे संतापले
वडीगोद्री(जालना)- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस आणि मुंडे यांची भेट माझ्यासाठी शॉकिंग आहे, मला काही विश्वास बसत नाही. गोरगरिबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनी मुंडेंची भेट घेतली असेल, तर हे दुर्दैव आहे. त्यांच्याइतका विश्वासघाती या पृथ्वीतलावर जन्मू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच, धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची भेट घेतली.
यावेळी जरांगे पाटील म्हणतात, इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जातात. त्यांच्या लोकांनी खून घडून आणला, त्याला एकदाही देशमुख कुटुंबियाकडे यावे नाही वाटले. तुम्हाला कोणती एवढी माया सुटली की, तुम्ही त्यांना भेटायला गेलात? इतक्या क्रूर माणसाला जर तुम्ही भेटायला जात असाल, तर या गोरगरीब मराठ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? असा सवाल जरांगे पाटील यांनी सुरेश धसंना केला. तुमच्या राजकारणासाठी, एखाद्या पदासाठी आणि स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडता आणि देशमुख कुटुंब मात्र उन्हात पडले. इकडे तिकडे हिंडायचं असेल तर यामध्ये यायचेच नाही, असं म्हणत जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना सुनावले.
सुरेश धसांना इकडे समाजाची वाहवा करून घ्यायला पाहिजे, समाजाच्या पाठीवर हात फिरवायला पाहिजे आणि राजकारण पण करायचे. मला वाटते त्यांनी काहीतरी एकच करावे. सुरेश धसांना फक्त मोठेपणा घ्यायची हाव आहे. ज्याने माणसं कापून टाकली, तुम्ही त्यांना भेटायला जाता. मराठ्यांनी तुमच्यावर खूप विश्वास टाकला, गोरगरीब मराठ्यांच्या तोंडात माती टाकता का? तुम्हाला त्यांचे तोंड बघायची गरज काय होती? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसा खून करणाऱ्या पेक्षा आणि खंडणी मागण्यापेक्षा कट रचणारा दोषी असतो, तसाच सुरेश धस दोषी असेल, अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांनी जहरी टीका केली.