कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:46 IST2018-11-30T00:44:35+5:302018-11-30T00:46:32+5:30
जिल्हाभरात तब्बल १ हजार ३२४ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.

कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक
विकास व्होरकटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आरोग्य विभागातर्फे मागील तीन महिन्यात लहान बालकांचे वजन मोजण्यात आली असून, यात जिल्हाभरात तब्बल १ हजार ३२४ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. कुपोषित बालकांची ही आकडेवारी वाढण्यामागे महिला, बाल कल्याण विकास विभाग व जिल्हा रूग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रातील कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगत आहेत. पण, हा कुपोषित बालकांचा आकडा चिंताजनक असल्याचे दिसत आहे.
० ते ६ वयोगटातील मुलांना योग्य तो आहार मिळावा. त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी शासनातर्फे विविध योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. असे असले तरीही जिल्ह्यात दिवसेंदिवस कुपोषित बालकांची आकडेवारी वाढत चालली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. आॅक्टोबर महिन्याचा त्रैमासिक अहवाल आरोग्य विभागातर्फे महिला, बाल कल्याण विकास विभागाला दिला आहे. यात त्यांनी आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोंबर या तीन महिन्यात जिल्हाभरात ० ते ६ वयोगटातील १ लाख ३३ हजार २९३ बालकांची वजन मोजली आहेत. यात त्यांना १ हजार ३२४ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले. दारिद्र्य कुटुंब स्थलांतरीत होणे यामुळे ही आकडेवारी असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत.
जिल्हा रुग्णालय : पोषण पुनर्वसन केंद्र
जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी शासनातर्फे सन २०१६ मध्ये जिल्हा रूग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे कुपोषित बालकांवर १४ दिवस उपचार केले जातात. यामध्ये बालकांना समतोल आहार, फळे, विविध डाळी, पालेभाज्या दिल्या जातात. यामुळे कुपोषित बालके येथे सुदृढ बालके होतात. या पोषण पुनर्वसन केंद्रात मागील वर्षी एप्रिल २०१७-१८ या कालावधीत १५५ बालकांवर उपचार करण्यात आले होते. यंदा एप्ा्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या काळावधित १०९ बालकांनी उपचार घेतले असून सध्या ७ जणांवर उपचार सुरू आहेत.