विसरलेला जेवणाचा डबा ठरला वरदान; जखमी रेवती यांनी सांगितला 'समृद्धी' अपघाताचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:46 IST2026-04-02T18:45:12+5:302026-04-02T18:46:19+5:30
बसायचं, तेवढ्यात गाडी धडकली अन् आम्ही बाजूला पडलो

विसरलेला जेवणाचा डबा ठरला वरदान; जखमी रेवती यांनी सांगितला 'समृद्धी' अपघाताचा थरार
जालना: "आम्ही काम संपवून गाडीत बसत होतो, तेवढ्यात पाठीमागून आलेल्या कंटेनरने पिकअपला जोरदार धडक दिली. मी बाजूला फेकले गेले आणि त्यानंतर मला काहीच समजले नाही..." अशा शब्दांत समृद्धी महामार्गावरीलअपघाताचा भीषण थरार जखमी रेवती योगेश मदन (रा. केळीगव्हाण) यांनी सांगितला. जालना येथील कलावती रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी 'लोकमत'शी बोलताना त्या काळरात्रीची भयावह परिस्थिती मांडली.
या अपघातातून काही जणी सुदैवाने बचावल्या असल्या तरी, त्यांच्या डोळ्यासमोर घडलेली ही घटना त्यांच्या मनातून जात नाहीये.
एका डब्यामुळे वाचला जीव
केळीगव्हाण येथीलच कासाबाई मदन यांच्यासाठी विसरलेला जेवणाचा डबा चक्क 'जीवनदान' ठरला. सर्व महिला काम संपवून पिकअपमध्ये बसत असताना, कासाबाई यांचा डबा विसरला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या डबा आणण्यासाठी गाडीतून उतरून थोड्या अंतरावर गेल्या. नेमक्या त्याच क्षणी भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या पिकअपला चिरडले. डबा आणायला गेल्यामुळे कासाबाई या भीषण मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावल्या, मात्र आपल्या सहकाऱ्यांची अवस्था पाहून त्या आजही प्रचंड धक्क्यात आहेत.
"रुग्णालयात आल्यावर सगळं समजलं"
रेवती मदन यांनी सांगितले की, "गाडी रस्त्यावर थांबलेली होती. काही महिला आत बसल्या होत्या, तर मी आणि कविता चौधरी गाडीत बसत होतो. धडक इतकी जोरात होती की आम्ही लांब फेकले गेलो. कविता यांना गंभीर मार लागला आहे. मला रुग्णालयात शुद्ध आल्यानंतर समजले की आमचे अनेक सोबती आता या जगात नाहीत." या अपघातात रेवती यांच्या सासू कडूबाई मदन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृतांचा आकडा आणि जखमींची अवस्था
समृद्धी महामार्गावरील या अपघाताने संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. ८ महिलांचा बळी घेणारा हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या जखमी महिलांवर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, डोळ्यादेखत आपल्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मरताना पाहिल्याचा मानसिक आघात या महिलांवर मोठा आहे.