Jalana: धामणा व पद्मावती वगळता जुई, जीवरेखा, बाणेगाव धरणांतील पाणीप्रश्न मिटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:43 IST2025-06-04T19:42:01+5:302025-06-04T19:43:03+5:30
पाचपैकी तीन प्रकल्पांत पाच टक्क्यांपर्यंत पाणीसाठा वाढला, मात्र दोन प्रकल्प ‘जैसे थे’

Jalana: धामणा व पद्मावती वगळता जुई, जीवरेखा, बाणेगाव धरणांतील पाणीप्रश्न मिटला
जालना : जिल्हाभरात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भोकरदन-जाफराबाद तालुक्यांतील लघु-मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये बाष्पीभवनामुळे या धरणातील पाणीपातळीत मोठी घट झाली होती. परिणामी, मे आणि जून महिन्यात नागरिकांवर पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. कारण, जुई प्रकल्पात १७, तर धामणा २३, पद्मावती २०, बाणेगाव ३७ आणि जीवरेखा धरणात ११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता; परंतु मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धामणा आणि पद्मावती वगळता तीन धरणांत १ ते ५ टक्के पाणीसाठा वाढला असून, पाणीटंचाई टळल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई, सेलूद येथील धामणा, राजूर परिसरातील बाणेगाव, पद्मावती येथील पद्मावती आणि जाफराबाद तालुक्यांतील अकोला देव परिसरातील जीवरेखा धरणावर दोन तालुक्यांची मदार आहे. उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठ्यात घट झाली होती. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील काही गावांत टँकर सुरू केले होते; परंतु या अवकाळी पावसामुळे धामणा आणि पद्मावती वगळता तीन धरणांत १ ते ५ टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
जुई धरणाचे भोकरदनसह बारा गावांना पाणी
दानापूर परिसरातील जुई धरणात एप्रिल महिन्यात तापमान ४२ अंशावर गेल्याने पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता; परंतु मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात केवळ एक टक्के वाढ झाली असून, भोकरदनसह बारा गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.
- किरण कतोरे, मोजणीदार.
धरणातील मे आणि जून महिन्यातील पाणीसाठा टक्केवारीमध्ये
प्रकल्प गाव मेमधील टक्केवारी जूनची टक्केवारी रिकामे
जुई -दानापूर-१७-०१-८२
धामणा- शेलूद-२३-२३-७७
पद्मावती- पद्मावती-२०-२०-८०
जीवरेखा-अकोला देव-११-१७-८३
बाणेगाव- बाणेगाव-३६-४०-६०
सध्या पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाही
जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्प हा सर्वांत मोठा मध्यम प्रकल्प आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात धरण कोरडेठाक पडल्याने शेतकऱ्यांनी धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढून नेला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात तीन ते पाच टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तरी परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाही.
- बी. आर. जगदाळे, मोजणीदार, जीवरेखा धरण.