मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 16:41 IST2026-04-04T16:36:32+5:302026-04-04T16:41:17+5:30
पुतळे कोण विकतेय हे मला माहितीच नाही; वाद होईल अशा ठिकाणी छत्रपतींचे पुतळे बसवू नका: जरांगे

मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
चांगलं झालं, आपल्या आपल्यातला वाद मिटला; अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथील वाद संपल्याच्या घटनेवर दिली आहे. शनिवारी दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी अंकुशनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.अंजनगाव तणावमुक्त झाल्याच्या घटनेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपतींचा सन्मान करणारे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचं जरांगे म्हणाले. छत्रपतींनी सगळ्या समाजांना एकत्र ठेवले आणि त्याच विचाराने आपण सुद्धा पुढे जाणे खूप गरजेचे आहे, अंजनगावातील पुढचा होणारा मोठा वाद टळला आहे, असं म्हणत याच्या पाठीमागे कोण होतं? हे पोलीस प्रशासनाने शोधून काढले पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी व्यक्त केली आहे. हा वाद मिटला हे खूप चांगले झाले, आता धनगर बांधव आणि मराठा बांधव गुण्यागोविंदाने नांदतील, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
एक दोन दिवसानंतर जाऊन त्या गावातील मराठा समाज, धनगर बांधव आणि बाबाजींची भेट घेऊ, अशी माहितीही जरांगे यांनी दिली. आमचा काही वादच नाही, हा वाद लावला जातोय का? याची मला शंका आहे. पुतळा विकणारा कोण? त्याचा शोध घ्यावा लागणार, असं म्हणत माझं नाव वापरून विनाकारण मला कोणी डाग लावण्याचे काम करू नये, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभे करू नका, असं सांगत छत्रपती शिवराय आमच्यासाठी प्रमाण आहे. त्यांच्याशिवाय आमच्या आयुष्याला किंमत नाही, असंही जरांगे म्हणालेत. छत्रपतींसाठी जिथे वाद होतील तिथे छत्रपतींचे पुतळे बसू नका, असा सल्ला ही जरांगे यांनी दिला. मला हे षडयंत्र काय आहे ते कळायला तयार नाही, असं म्हणत पुतळ्याच्या आडून मराठ्यांविरुद्ध षडयंत्र आहे का? हे बघणे गरजेचे आहे, असंही जरांगे यांनी नमूद केलंय.
मराठा समाजापासून दलित, मुस्लिम, धनगर, बहुजन हे समाज तुटले नाही पाहिजे, अशी भावनाही जरांगे यांनी यावेळी व्यक्त केली. पुतळ्याच्या आडून आपल्यात कोणी तेढ निर्माण करते आहे का? ते बघायला हवे. मराठ्यांविरोधात दुसऱ्या जाती घालण्याचा प्रयत्न कोण करतंय हे बघितलं पाहिजे, असंही जरांगे म्हणालेत. पुतळे देणारे कोण आहे? ते पण बघावे लागणार, असं म्हणत पुतळे बसवणारा बसतोय, मराठा समाज नाही बसवत, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. छत्रपतींचा पुतळा बसवा किंवा नका बसवू मी कोणालाच काहीच म्हणत नाही, असं म्हणत हा पुतळा जाणूनबुजून बसवला गेला का? याचा मी शोध घेतोय, अशी माहिती देखील जरांगे यांनी दिली.
पुतळा विकणारा कोण? पुतळा घेणारा कोण? पुतळा बसवणारा कोण? हे बघणे गरजेचे आहे, असं म्हणत मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? अशी शंका जरांगे यांनी व्यक्त केली आहे. पुतळे कोण विकतेय हे मला माहितीच नाही, असं स्पष्ट करत वाद होईल अशा ठिकाणी छत्रपतींचे पुतळे बसवू नका, असं आवाहनही जरांगे यांनी मराठा बांधवांना केले आहे.