"मराठ्यांच्या नादी लागलात, तर सरकारलाच हादरा!"; मनोज जरांगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:51 IST2025-08-12T17:49:47+5:302025-08-12T17:51:34+5:30
गणपती बाप्पासोबत मुंबईत मराठ्यांची विक्रमी मिरवणूक काढणार, 29 ऑगस्टला विजयी गुलाल उडणार

"मराठ्यांच्या नादी लागलात, तर सरकारलाच हादरा!"; मनोज जरांगेंचा इशारा
- पवन पवार
वडीगोद्री (जालना) : "मराठ्यांच्या नादी लागू नका, अन्यथा सरकारलाच अडचणीत आणाल", असा थेट इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. आमदार परिणय फुके यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी अंकूशनगर येथील निवासस्थानी आज दुपारी माध्यमांशी संवाद साधला.
चार दिवसांच्या परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर दौऱ्यापूर्वी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जातीयवादाचा आरोप केला. "मराठा-ओबीसी वाद वाढवणे राज्याच्या प्रमुखांना शोभत नाही. मराठ्यांना कमी लेखू नका. माझ्या नादी लागण्याचा प्रयत्नही करू नका," असा इशारा त्यांनी दिला.
गणपती मिरवणुकीतून आंदोलनाचा संदेश
जरांगे पाटील यांनी जाहीर केलं की 27 ऑगस्ट रोजी मराठा समाज गणपती बाप्पाला घेऊन मुंबईत भव्य मिरवणूक काढणार आणि समुद्रात विसर्जन करणार. "आमची मुंबई, आमचा समुद्र आणि आमची संस्कृती, यावर कुणाचंही बंधन चालणार नाही. ही मिरवणूक विक्रमी ठरणार आहे," असं त्यांनी सांगितलं.
आरक्षणासाठी लढा सुरूच
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठीचा संघर्ष सुरू असल्याचं सांगत जरांगे पाटील म्हणाले, "मुंबईत एकाही आंदोलकावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यास मराठा समाज आणि तुम्ही आमनेसामने उभे राहाल. 29 ऑगस्टला विजयाचं गुलाल उडवणार, आरक्षण मिळवणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.