राजूर परिसरातील दोन प्रकल्पांना संरक्षणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:25 IST2019-11-02T00:23:47+5:302019-11-02T00:25:10+5:30
राजूरसह परिसरातील पंधरा गावांची तहान भागविणाऱ्या बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून वारंवार खोडसाळपणा करून प्रकल्पाचे गेट उघडण्यात येत आहे.

राजूर परिसरातील दोन प्रकल्पांना संरक्षणाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : राजूरसह परिसरातील पंधरा गावांची तहान भागविणाऱ्या बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून वारंवार खोडसाळपणा करून प्रकल्पाचे गेट उघडण्यात येत आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने दोन्ही प्रकल्पांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांधून होत आहे.
भोकरदन तालुक्यातील बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातून राजूरसह पंचक्रोशितील पंधरा गावांची तहान भागवली जाते. दोन्ही प्रकल्पाच्या परिसरातील शेतकरी बुडीत क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करतात. प्रकल्प पाण्याने तुडूंब भरण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर पिकाला अडचण निर्माण होवू नये, म्हणून काही अज्ञात व्यक्ती खोडसाळपणा करून प्रकल्पातील पाण्याला वाट मोकळी करून देतात. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. गेल्या तीन वर्षांपासून चांधई एक्को मध्यम प्रकल्प तुडूंब भरल्यानंतर अज्ञात व्यक्तीने प्रकल्पाच्या मध्यभागी छिद्र पाडून पाण्याला वाट मोकळी करून दिली होती.
लघूपाटबंधारे विभागाचे प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने माथेफिरूंचे फावत आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. दोन्ही प्रकल्पात जलसाठा न झाल्यास परिसरातील पंधरा गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते, यावर्षी पावसाळ््यात एकही पाऊस न झाल्याने दोन्ही प्रकल्प कोरडेठाक होते. मात्र, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
२९ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री बाणेगाव मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे साखळी, कुलूप तोडून दरवाजे खुले करण्यात आले होते. यामुळे रात्रभर लाखो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे अज्ञाताने साखळी कुलूप घेऊन पोबारा केलेला आहे.
महसूल विभागाने बुधवारी दरवाजा बसविला. मात्र, संबंधित विभागाने यावर कोणतीच ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अज्ञात लोकांचे फावत असल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहे.