बाजारपेठेत कापसाचे भाव कोसळले; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा पणनकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:04 IST2020-02-28T00:04:04+5:302020-02-28T00:04:47+5:30
खुल्या बाजारपेठेत कापसाचे भाव क्विंटलमागे ५०० रूपयांनी खाली आले आहेत. याचा परिणाम पणन महासंघाच्या (सीसीआय) खरेदीवर जाणवला आहे.

बाजारपेठेत कापसाचे भाव कोसळले; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा पणनकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खुल्या बाजारपेठेत कापसाचे भाव क्विंटलमागे ५०० रूपयांनी खाली आले आहेत. याचा परिणाम पणन महासंघाच्या (सीसीआय) खरेदीवर जाणवला आहे. अनेक शेतकरी आता आपला कापूस विक्रीसाठी पणनकडे आणत असल्याने केंद्रावर मोजणी करण्यासाठी विलंब लागत आहे.
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात पणन महासंघाचे कापूस खरेदीस प्रारंभ केला होता. आतापर्यंत जवळपास १ लाख ४० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पणन महासंघाकडून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५५०० रूपये भाव दिला जात होत. परंतु, आता पाहिजे तसा दर्जेदार कापूस येत नसल्याने १०० ते २०० रुपये दरामध्ये कपात करण्यात आली आहे. असे असले तरी खुल्या बाजारपेठेतील दरापेक्षा आमचे दर हे हमीभावाचे असल्याने त्यात कमी करता येत नाही.
जिल्ह्यातील जालना, बदनापूर, परतूर, मंठा येथेही सीसीआयने खरेदी केंद्र सुरू केले आहेत. तेथेही ब-यापैकी कापसाची आवक सध्याही कायम आहे. जालना बाजार समितीत सर्वाधिक आवक झाली असून, आजघडीला शेकडो वाहने कापूस विक्रीसाठी बाजार समितीच्या परिसरात उभी आहेत.
खुल्या बाजारपेठेतील व्यापा-यांनी शेतक-यांना रोखीने पैसे दिल्याने काही जणांनी कमी किमतीतही त्यांना कापूस विकून आपली आर्थिक गरज भागविली आहे. यासंदर्भात पणनचे अधिकारी हेमंत ठाकरे यांनी सांगितले.