अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:17 IST2025-02-14T12:08:10+5:302025-02-14T12:17:24+5:30
उपोषण सोडताना दिलेल आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे १५ फेब्रुवारी पासून अंतरवली सराटी येथे साखळी उपोषण करण्याच जाहीर केले होते.

अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : अंतरवली सराटी येथे उद्या, १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या साखळी उपोषणाबाबत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हे उपोषण दहा-पंधरा दिवसांसाठी पुढं ढकलल्याची घोषणा जरांगे यांनी आज सकाळी केली. ते अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषदेस संबोधित करत होते.
जरांगे पुढे म्हणाले, उपोषण सोडताना दिलेल आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे १५ फेब्रुवारी पासून अंतरवली सराटी येथे साखळी उपोषण करण्याच जाहीर केले होते. मात्र, काल आम्ही केलेल्या दोन मागण्यांचा शासन निर्णय सरकारने घेतला आहे. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, गॅझेट लागू करू म्हणून उल्लेख केला आहे. त्यासोबतच सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ लागणार असल्याच त्यांनी सांगितलं. चार पैकी दोन मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली, त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. राहिलेल्या दोन मागण्यांची येत्या आठ-पंधरा दिवसात अंमलबजावणी सरकारने करावी, असेही जरांगे यावेळी म्हणाले.
... तर सरकारला सहकार्य
सरकार काम करत असेल तर कशाला उपोषण करायचं. उलट सरकार काम करत असेल तर सहकार्य केलं पाहिजे, या भूमिकेत राहिले पाहिजे असे मत जरांगे यांनी उपोषण पुढे ढकलल्याच्या निर्णयावर व्यक्त केले.