चैतन्य तुपेचे अपहरण करून जाताना कारची ट्रकला धडक; कारचालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:24 IST2025-02-07T14:09:50+5:302025-02-07T14:24:36+5:30
मुलाचे अपहरण करून पसार होताना कारचालकाने वाहनामध्येच दारू पिली; जाफराबादकडे जाताना असई फाट्याजवळ त्याच्या भरधाव वेगातील कारने रोडवर उभ्या असलेल्या जितो लोडिंगला जोराची धडक दिली.

चैतन्य तुपेचे अपहरण करून जाताना कारची ट्रकला धडक; कारचालकावर गुन्हा दाखल
भोकरदन : छत्रपती संभाजीनगर येथून चैतन्यचे अपहरण करून सुसाट निघालेल्या बलोनो कारने (एमएच २०, ईई ७१२६) रस्त्यावर उभ्या असलेल्या जितो लोडिंग गाडीला (एमएच २१, बीएच ६०४८) धडक देत भोकरदन-जाफराबाद रस्त्यावरील असई (ता. जाफराबाद) फाट्याजवळ अपघात झाला होता. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात गोपाल हरिदास परमेश्वर (रा. जांब, ता. जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून हर्षल उर्फ ज्ञानेश्वर शेवत्रे (रा. ब्रम्हपुरी, ता. जाफ्राबाद, जि. जालना) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
कारचालकाने वाहनामध्येच दारू पिऊन जाफराबादकडे जाताना असई फाट्याजवळ त्यांची बलोनो कारने भरधाव वेगाने रोडवर उभ्या असलेल्या जितो लोडिंगला जोराची धडक दिली. कार खांबाला धडकून दोनवेळा उलटली. तसेच बाजूच्या शेतात जाऊन पडली. त्याचवेळी आरोपी हर्षल चैतन्यला घेऊन पळून गेला. त्यापाठोपाठ जीवन, शिवराज पसार झाले. या अपघातात प्रणव शेवत्रे मात्र जखमी झाला होता. तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना लोडींग गाडी मालक गजानन भावले यांनी पकडले व चोप दिला. त्यानंतर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या गाडीचा अपहरण प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. भोकरदन पोलिसांनी गाडीच्या नंबर प्लेटवरून मालकाचा शोध घेतला असता त्या क्रमांकाची गाडी छत्रपती संभाजीनगर येथे मूळ मालकाच्या घरासमोर उभी होती. त्यामुळे अपघात झालेली गाडी ही चैतन्यचे अपहरण प्रकरणातील असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर चैतन्य तुपेची सुटका करण्यात आली.