कार कालव्यात कोसळण्यापासून बचावल्याने अनर्थ टळला; वडीगोद्रीजवळ भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:56 IST2025-05-28T15:54:15+5:302025-05-28T15:56:27+5:30
धुळे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका कायम; कार कालव्यात कोसळल्यापासून बचावल्याने मोठा अनर्थ टळला असून ८ प्रवासी जखमी आहेत

कार कालव्यात कोसळण्यापासून बचावल्याने अनर्थ टळला; वडीगोद्रीजवळ भीषण अपघात
- पवन पवार
वडीगोद्री (जालना):छत्रपती संभाजीनगरहूं देवदर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेली कार वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्यावरील पुलाच्या कठड्याला धडकली. ही घटना चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली असून, या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने, कार कालव्यात कोसळण्यापासून वाचली आणि एअर बॅग उघडल्यामुळे चालक व समोरील प्रवासी गंभीर जखमांपासून बचावले.
अपघातग्रस्त कार (एमएच २० जीई ३७२३) छत्रपती संभाजीनगर येथून निघून पंढरपूरकडे जात होती. धुळे-सोलापूर महामार्गावरून जाताना वडीगोद्री उड्डाण पुलावरून खाली उतरताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट डाव्या कालव्याच्या पुलावर जाऊन आदळली. कार कालव्यात कोसळल्यापासून बचावल्याने मोठा अनर्थ टळला. कारमधील ८ प्रवासी एअर बॅग वेळीच उघडल्याने सुखरूप आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत असून, निष्काळजीपणा, भरधाव वेग आणि वाहनावर नियंत्रण नसणे ही प्रमुख कारणे ठरत आहेत.
अपघातात जखमी झालेल्यांची नावे:
हौसाबाई हरिश्चंद्र तांबे (वय ७०), विष्णू हरिश्चंद्र तांबे (वय ५५), सरला विष्णू तांबे (वय ४०), वैभव विष्णू तांबे (वय १८), वृषाली विष्णू तांबे (वय १७) - सर्वजण डोणगाव तांबे, छत्रपती संभाजीनगर येथील, कौशल्याबाई भीमराव जाधव (वय ७०), कडेठाण, मीरा रमेश लहाने (वय ४०), प्रीती रमेश लहाने (वय १९), दोघी घारेगाव रहिवासी
दरवाजे फोडून जखमींना बाहेर काढले
अपघात घडल्यानंतर वडीगोद्री येथील ग्रामस्थांनी तत्परतेने मदतकार्य करत दरवाजे फोडून जखमींना बाहेर काढले. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रातून दोन रुग्णवाहिकांच्या साहाय्याने त्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.