वडीगोद्री उड्डाणपुलावर धावत्या कारने घेतला पेट; चार प्रवाशांनी वेळीच उड्या घेतल्याने अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:05 IST2026-02-20T16:01:19+5:302026-02-20T16:05:25+5:30
बीडहून छत्रपती संभाजीनगरला जात असताना कारने अचानक पेट घेतला; काही सेकंद उशीर झाला असता तर...

वडीगोद्री उड्डाणपुलावर धावत्या कारने घेतला पेट; चार प्रवाशांनी वेळीच उड्या घेतल्याने अनर्थ टळला
वडीगोद्री (जालना): धुळे-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी दुपारी एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची खळबळजनक घटना घडली. वडीगोद्री टी-पॉईंटवरील उड्डाणपुलावर ही आग लागली. सुदैवाने, कारच्या एसीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली आणि चारही प्रवासी तातडीने खाली उतरले. प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील एक कुटुंब आपल्या मित्राची कार (MH-11-DD-6081) घेऊन नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांची कार वडीगोद्री उड्डाणपुलावर आली असता, अचानक एसीच्या व्हेंट्समधून धूर निघू लागला.
एसीतून धूर आला अन् गाडी पेटली! धुळे-सोलापूर महामार्गावर थरार; वडीगोद्री उड्डाणपुलावर कार जळून खाक #jalanacrime#marathwadapic.twitter.com/58VZDHfISN
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 20, 2026
अग्निशमन दलाची उणीव भासली
धूर दिसताच प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडीतून बाहेर उड्या घेतल्या. ते बाहेर येताच कारने भीषण पेट घेतला. महामार्गावर वडीगोद्री परिसरात अग्निशमन दलाची सुविधा नसल्याने आग विझवण्यासाठी ग्रामस्थांना मर्यादा आल्या. कार पूर्णपणे जळेपर्यंत आग आटोक्यात येऊ शकली नाही. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.