'समृद्धी'वर केमिकल टँकरमधून अमोनियम नायट्रेटची गळती; जालन्याजवळ मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:05 IST2026-04-08T12:02:34+5:302026-04-08T12:05:10+5:30
प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; अग्निशमन दलाचा पाण्याचा मारा, परिस्थिती नियंत्रणात

'समृद्धी'वर केमिकल टँकरमधून अमोनियम नायट्रेटची गळती; जालन्याजवळ मोठा अनर्थ टळला
जालना : समृद्धी महामार्गावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका धोकादायक रसायन वाहून नेणाऱ्या टँकरमधून गळती सुरू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. 'अमोनियम नायट्रेट मेल्ट'सारख्या अत्यंत संवेदनशील रसायनाची ही गळती निधोना (जि. जालना) शिवारात झाल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. मात्र, वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर काही काळ महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तर, काहीवेळा वाहतूक वळविण्यात आली होती. आता परिस्थिती नियंत्रणात असून, रसायन नष्ट करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल नंबर ३६० जवळ (जीजे.१२. बीवाय ८४००) क्रमांकाचा टँकर जात असताना नागपूरकडे त्यातून केमिकल गळती होत असल्याचे नियंत्रण कक्षाच्या निदर्शनास आले. सोमवारी सायंकाळी ५:३२ वाजता ही माहिती मिळताच आरटीओ पथक, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाने ५:५० वाजेपर्यंत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली. तर वाहनधारकांना सिंदखेडराजा येथूनच खाली उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक पुन्हा काहीकाळ बंद केली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अग्निशमक दलाच्या जवानांनी टॅंकरवर पाण्याचा मारा केला. आता रसायन हळूहळू नष्ट करण्याचे काम सुरू असून, महामार्गावरील वाहतूकदेखील सुरू करण्यात आली.
वेल्डिंग जॉइंटमधून गळती
सदरील टॅंकरची तपासणी केली असता, टँकरमधील 'अमोनियम नायट्रेट मेल्ट' या रसायनाची टँकरच्या मागील बाजूच्या वेल्डिंग जॉइंटमधून गळती होत असल्याचे दिसून आले. हे रसायन 'ऑक्सिडायझर' श्रेणीत येत असल्याने सार्वजनिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता.
युद्धपातळीवर बचावकार्य
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. टँकरला सुरक्षित अंतरावर उभे करून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. महामार्गावरील वाहतूक थांबवून सुरक्षित मार्गाने वळवण्यात आली. जेणेकरून प्रवाशांना धोका होऊ नये. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत रसायनाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यावर सतत पाण्याचा मारा सुरू केला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून, तेही मदतीसाठी दाखल झाले आहेत.
मोठा धोका टळला!
हे रसायन अत्यंत ज्वलनशील श्रेणीत येत असल्याने छोटीशी चूकही मोठ्या स्फोटाला निमंत्रण देऊ शकली असती. मात्र, माहिती मिळताच अवघ्या १८ मिनिटांत मदत पथक पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. शासनाकडून संबंधित वाहन चालकावर आणि मालकावर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळताच मंगळवारी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, महामार्गाच्या पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, प्रभारी आरटीओ शेख यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.
वाहतूक थांबविली होती
सोमवारी सायंकाळी एका टॅंकरमधून केमिकलची गळती होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपाययोजना करण्यात आल्या. जोपर्यंत तापमान खाली येत नाही, तोपर्यंपत वाहतूक थांबविली होती. त्यानंतर वाहतूक वळविण्यात आली. रात्री त्याचे तापमान १५० डिग्रीवर होते. सकाळी १०० तर आता ७० डिग्रीवर आले. आता नष्ट करण्याचे काम सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती.
-आयुष नोपाणी, अपर पोलिस अधीक्षक