थरारक! जालन्याजवळ टायर फुटताच ट्रॅव्हल्सने पेट घेतला; चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:22 IST2026-01-27T14:21:30+5:302026-01-27T14:22:00+5:30
जालना महामार्गावर आगीचं तांडव! खासगी ट्रॅव्हल्स जळून खाक; पुण्याहून यवतमाळला जाताना काळाचा घाला.

थरारक! जालन्याजवळ टायर फुटताच ट्रॅव्हल्सने पेट घेतला; चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावले!
सेलगाव (जालना): पुण्याहून यवतमाळकडे निघालेल्या प्रवाशांच्या पहाटेच्या साखरझोपेत अचानक 'आगी'चा गजर झाला. जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सेलगाव शिवारात एका खासगी ट्रॅव्हल्सला (MH 29 AW 4444) भीषण आग लागली. मात्र, चालक भीमराव घोडे यांच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले असून एक मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकी घटना काय? मंगळवारी पहाटे ही बस सेलगाव परिसरात आली असताना मागचा टायर अचानक फुटला. काही क्षणांतच मागच्या बाजूने धूर येऊ लागला. आरशात धूर दिसताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि आरडाओरड करून प्रवाशांना जागे केले. "लवकर खाली उतरा, गाडी पेट घेत आहे!" या एका सूचनेमुळे घाबरलेले प्रवासी तातडीने खाली उतरले.
मदतीसाठी धावले पेट्रोल पंप कर्मचारी
प्रवासी उतरत असतानाच आगीने रौद्र रूप धारण केले. जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी 'फायर एक्स्टिंग्विशर' घेऊन धाव घेतली, मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग आटोक्यात आली नाही. काही वेळातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बदनापूर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत बसचा केवळ सांगाडा शिल्लक उरला होता.
जीव वाचला, सामान जळून खाक
या अपघातात प्रवाशांच्या बॅगा आणि मौल्यवान सामान जळून खाक झाले आहे. मात्र, "जीव वाचला हेच आमच्यासाठी खूप आहे," अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, जी पोलिसांनी तातडीने सुरळीत केली.