७ हजार ८०० हेक्टर उसाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:18 IST2019-10-27T00:17:54+5:302019-10-27T00:18:08+5:30
परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणारे निम्म दुधना धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे

७ हजार ८०० हेक्टर उसाला जीवदान
शेषराव वायाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला पाणीपुरवठा करणारे निम्म दुधना धरण मृत साठ्यातून बाहेर आले आहे. यामुळे परतूर तालुक्यातील ७ हजार ८०० हेक्टरवरील उसाला जीवदान मिळाले असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.
धरणातील पाणी व बॅक वॉटरवर अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून उसाची लागवड केली. यामुळे हळूहळू तालुक्यात उसाचे प्रमाण वाढत गेले. बागेश्वरी कारखाना सुरळीत सुरू झाल्याने शेतकरी उसाकडे वळू लागले.
परंतु, तालुक्यात उसाचे पीक वाढत असतानाच मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाला. विहिरी, बोअरची पाणीपातळी घटण्याबरोबरच निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडावे लागले. यामुळे दुधना नदीच्या पात्रातील बॅक वॉटरमध्येही घट झाली. धरण कोरडे झाल्याने उसाचे क्षेत्रही अडचणीत आले.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी उसाचे क्षेत्र कमी करून इतर पिकांकडे वळू लागले.
मात्र, मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने दुधना नदीसह इतर नद्या व नाल्यांना पूर आला. यामुळे विहिरी व बोअरची पाणीपातळी वाढली आहे.
निम्न दुधनात ५० टक्के जलसाठा
निम्न दुधना प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू असल्याने मृत साठ्यातून धरण बाहेर आले आहे. तसेच श्रीष्टी जवळील कसूरा धरणात ही ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे घटत जाणाºया उसाच्या पिकाला जीवदान मिळाले असून, शेतकरी आनंदी दिसत आहे.