युद्धाचा भडका अन् भारताला झळा; होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प झाल्याने कच्च्या तेलासह गॅससाठी भारताची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 04:37 IST2026-03-06T04:37:15+5:302026-03-06T04:37:26+5:30
बासमती तांदूळ, खते, हिरे उद्योग, चहा विमान वाहतूक क्षेत्राला फटका बसण्याची भीती; मालवाहतुकीचे मार्ग विस्कळीत

युद्धाचा भडका अन् भारताला झळा; होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प झाल्याने कच्च्या तेलासह गॅससाठी भारताची कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : युद्धाचे ढग आता भारतीय अर्थव्यवस्थेवर घोंघावू लागले आहेत. युद्ध दीर्घकाळ चालल्यास बासमती तांदूळ, खते, हिरे उद्योग, चहा आणि विमान वाहतूक क्षेत्रासह अनेक भारतीय उद्योगांना फटका बसू शकतो, असा इशारा ‘क्रिसिल रेटिंग्स’ने दिला.
कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ, निर्यातीमधील अडथळे आणि परदेशातून येणाऱ्या पैशांवर होणारा परिणाम ही सध्याची भारतासमोरची मोठी आव्हाने आहेत. मात्र या संकटांमुळे देशाची गती थांबणार नाही, असे आरबीआयच्या धोरण समितीचे सदस्य नागेश कुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई, बजाज यांची आखाती देशांकडे जाणारी वाहने तात्पुरती थांबवली आहेत.
‘या’ क्षेत्रांना बसणार थेट फटका
उत्पादन क्षेत्रावर परिणाम : सिरेमिक आणि खत उद्योगांना एलएनजीच्या तुटवड्यामुळे उत्पादनात अडथळे येतील. यामुळे शेतीला फटका बसेल.
खर्च वाढणार : कच्चे तेल महागल्यामुळे ऑइल रिफायनरी, टायर, पेंट, विशेष रसायने, पॅकेजिंग आणि सिंथेटिक कपडे निर्मितीची किंमत वाढेल.
निर्यात आणि सेवा : बासमती तांदूळ, हिरे पॉलिशिंग, एअरलाइन्स व ट्रॅव्हल ऑपरेटर्सना आर्थिक फटका बसेल.
कमाईवरही परिणाम
युद्ध काही आठवड्यांपेक्षा अधिक काळ चालल्यास भारतातील कॉर्पोरेट कंपन्यांच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा इशारा कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालात देण्यात आला आहे.
निर्यात का थांबली?
प्रत्येक कंटेनरवर २,००० डॉलर्सपर्यंत अतिरिक्त ‘इमर्जन्सी सरचार्ज’ आणि विमा प्रीमियम वाढल्याने कंपन्यांनी निर्यात थांबवली आहे. कंपन्या २ ते ३ आठवडे माल रोखून धरू शकतात. युद्ध लांबले तर भांडवलावर ताण येण्याची भीती आहे.
नेमका काय होईल परिणाम?
पेट्रोल-डिझेल : दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
शेती : खते महागल्याने उत्पादन खर्च वाढणार
विमान प्रवास : तिकीट दरांमध्ये वाढ होण्याची भीती
दैनंदिन वस्तू : पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च वाढल्याने महागाई वाढणार