माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 21:24 IST2026-04-04T21:24:09+5:302026-04-04T21:24:35+5:30
Iran War: अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला आता महिना लोटला आहे. यादरम्यान, आता इराणमध्ये राजकीय मतभेदही उफाळून आले आहेत. इराणचे माजी परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद जरीफ आणि माजी राष्ट्रपती हसन रुहानी यांच्यावर आता गद्दारी आणि अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होत आहे.

माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला आता महिना लोटला आहे. या युद्धातइराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते मारले गेले आहेत. तसेच इराणमधील पायाभूत सुविधांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर इराणकडूनही अमेरिका आणि इस्राइलसह आखाती देशांनाही लक्ष्य केलं जात आहे. यादरम्यान, आता इराणमध्ये राजकीय मतभेदही उफाळून आले आहेत. इराणचे माजी परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद जरीफ आणि माजी राष्ट्रपती हसन रुहानी यांच्यावर आता गद्दारी आणि अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होत आहे.
मोहम्मद जवाद जरीफ यांनी युद्ध संपवण्याची मागणी करत एक विस्तृत प्रस्ताव सादर केल्यापासून या वादाला सुरुवात झाली आहे. इराणने सध्या मिळालेल्या रणनीतित आघाडीचा वापर करून युद्ध सुरू ठेवण्यापेक्षा विजयाची घोषणा करून वाटाघाटींच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. जर युद्ध सुरू राहिले तर त्यात सर्वसामान्य नागरिकांच्या मृत्यूसह देशातीला पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, असे मत मांडले होते. जरीफ यांनी मांडलेल्या या भूमिकेनंतर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्याविरोधात आंदोलनं होत असून, त्यांची अमेरिकेचे एजंट म्हणून संभावना होत आहे.
केवळ जरीफच नाहीत तर इराणचे माजी राष्ट्रपती हसन रुहानी यांनीही इराणने सन्मानजनक मार्गाने युद्ध संपुष्टात आणण्याची तयारी केली पाहिजे, असा सल्ला दिला होता. राष्ट्रीय हित आणि जनतेच्या सुरक्षेचा विचार करून धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. तसेच पर्शियन आखातातील महत्त्वाचे भाग आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण कायम ठेवलं पाहिजे, असंही मत त्यांनी मांडलं होतं.
मात्र हसन रुहानी यांनी मांडलेलं मत इराणमधील राज्यकर्त्यांना फारसं सूचलेलं नाही. त्यांनी याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खासदार हामिद रसाई यांनी दोन्ही नेत्यांना तातडीने अटक केली पाहिजे, अशी मागणी कोर्टाकडे केली आहे. त्यांची वक्तव्ये देशाच्या विरोधात असून, यामुळे शत्रूंना फायदा मिळू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच तेहरानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनांमधून या दोन्ही नेत्यांविरोधात संताप दिसत असून, आंदोलकांनी जरीफ आणि रुहानी यांचे पुतळेही जाळले आहेत.