"इराणवर सुरु असलेले हल्ले थांबवावेत नाहीतर..."; तुर्कीच्या एर्दोगान यांचा अमेरिकेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 04:17 IST2026-03-03T04:16:33+5:302026-03-03T04:17:58+5:30
Turkey stance on US Iran conflict : तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

"इराणवर सुरु असलेले हल्ले थांबवावेत नाहीतर..."; तुर्कीच्या एर्दोगान यांचा अमेरिकेला इशारा
मध्य-पूर्वेतील पेटलेल्या वणव्यावर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराणवर होणारे हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगत, एर्दोगान यांनी या संघर्षाचे रूपांतर जागतिक महायुद्धात होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.
एर्दोगान यांनी इराणवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. हे हल्ले इराणच्या सार्वभौमत्वावर घाला असून यामुळे संपूर्ण प्रादेशिक सुरक्षा धोक्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या युद्धाची ठिणगी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या चिथावणीखोर धोरणांमुळे पडली आहे. इस्रायलची आक्रमक भूमिकाच या रक्तपाताला कारणीभूत असल्याचे त्यांनी इस्तंबूलमधील कार्यक्रमात नमूद केले. अमेरिकेने इराणवर सुरु असलेले हल्ले थांबवावेत नाहीतर कधीही न पेलवणारे परिणाम जगाला भोगावे लागतील, अशा शब्दांत एर्दोगन यांनी अमेरिका, इस्रायलला इशारा दिला आहे.
आखाती देशांवरील हल्ल्यांचाही निषेध
एर्दोगान यांनी केवळ अमेरिकेलाच नाही, तर इराणलाही सुनावले आहे. इराणने सौदी अरेबिया आणि यूएई यांसारख्या 'इस्लामी बंधू' देशांवर केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खामेनेई यांच्या मृत्यूवर चिंता
शनिवारी झालेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याने एर्दोगान यांनी दुःख व्यक्त केले आहे. यामुळे परिस्थिती अधिक हाताबाहेर जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तुर्की हा नेहमीच शांततेच्या बाजूने असून, जोपर्यंत युद्धविराम होत नाही, तोपर्यंत तुर्की सर्व स्तरावर राजनैतिक चर्चा सुरू ठेवणार असल्याचे एर्दोगान यांनी जाहीर केले.
इस्लामी जगताला साद
एर्दोगान यांनी आवाहन केले आहे की, पुढील रक्तपात थांबवण्यासाठी विशेषतः इस्लामी देशांनी एकत्र येऊन तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा, हे संपूर्ण क्षेत्र 'आगीच्या विळख्यात' अडकेल आणि त्याचे परिणाम कोणालाही सांभाळता येणार नाहीत.